घाटातील रस्ते सुधारले तरी धोका कायम

घाटातील रस्ते सुधारले तरी धोका कायम

कोट्यावधी रूपये खर्चुन घाटरस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील चारही घाटमार्गाना दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम आहे. दरीकडील बाजुला असलेली शेकडो मोकळी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संरक्षक कठडे ठिसुळ झाले आहेत. पाण्याची निचरा होणारी गटारे गाळाने तुडुंब भरली आहेत. त्यामुळे रस्ते चांगले असले तरी वाहनचालकांना यावर्षी देखील जीव मुठीत धरूनच घाटरस्ता पार करावा लागणार आहे.

प्रमुख मार्ग
पश्‍चिम महाराष्ट्राला जिल्ह्यातुन जोडणारे प्रमुख चार घाटमार्ग आहेत. यामध्ये सर्वाधिक वाहतुक असलेला करूळ घाट, भुईबावडा घाट, फोंडाघाट, आणि आंबोली घाट या घाटरस्त्याचा समावेश आहे. या चारही मार्गाने जाता येते. आपआपल्याला सोयीस्कर पडेल, अशा रस्त्याने वाहनचालक प्रवास करीत असले तरी सर्वाधीक पसंती करूळ घाटाला दिली जाते.

घाटरस्त्यांची सद्यस्थिती
बहुतांशी घाटरस्त्याचे नुतनीकरण केल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत घाटरस्ते यावर्षी वाहतुकीस चांगले आहे; परंतु रस्ते चांगले असले तरी पावसापुर्वी करावयाची अनेक कामे शिल्लक आहे. करूळ घाटात डोंगराकडील बाजुला खोदलेली गटारे दगड, मातीच्या गाळाने भरलेली आहे. फोंडाघाटात देखील तीच स्थिती आहे. हीच स्थिती भुईबावडा घाटात देखील आहे. रस्याकडेला खचलेल्या रस्त्याची पुर्नबांधणी अद्याप झालेली नाही. काही कामे घाटात सुरू आहेत; परंतु रस्त्याच्या दरीकडील बाजुची कित्येक ठिकाणे मोकळी आहेत. काही ठिकाणी तर एकावर एक दगड रचुन ठेवण्यात आले आहेत.

दरडीचा धोका कायम
जिल्ह्यातील चारही घाटांना दरडीचा धोका कायम आहे. करूळ घाटात सात, भुईबावडा घाटात सहा, फोंडाघाटात तीन तर आंबोली घाटात 5 ठिकाणे कधीही दरडी कोसळतील अशी आहेत. दरडी रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. दहा बारा वर्षापुर्वी बोल्डर नेटचा वापर दरडी रोखण्यासाठी केला जात होता; परंतु मागील पाच सहा वर्षात अशा प्रकारचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे थोडाअधिक पाऊस झाला तरी घाटरस्त्यांना दरडीचा धोका कायम आहे.

रस्ता खचण्याची संभावना
मागील काही वर्षात घाटरस्ते खचण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. बांधकाम विभागाकडुन सोयीस्करपणे होत असलेल्या दुर्लक्षामुळे या प्रकारात वर्षागणीक वाढ होताना दिसत आहे. रस्त्याकडेला किरकोळ स्वरूपात असलेली भगदाडे वेळीच न बांधल्यामुळे आणि पाण्याच्या निचऱ्यांकडे लक्ष न दिल्यामुळे रस्ते खचले जातात. करूळ घाटात सध्या तीन ते चार ठिकाणे रस्ता खचण्याची शक्‍यता आहे. भुईबावडा घाटात दोन तर फोंडाघाटात दोन ठिकाणी रस्ता खचेल अशी स्थिती आहे.

मोकळी ठिकाणे धोकादायक
घाटरस्त्यांना हजारो फुट खोलीची दरी आहे. याच दरीकडील बाजुला शेकडो मोकळी ठिकाणे आहे. यावर्षी दहा ते पंधरा ठिकाणी संरक्षक कठडे, संरक्षक भिंती बांधण्यात आल्या; परंतु अजुनही शेकडो ठिकाणी मोकळीच आहेत. दरीकडील बाजुला कधीकाळी बांधलेले संरक्षक कठडे ठिसुळ झालेले आहेत. हे कठडे देखील आपोआप कोसळु लागले आहेत.

क्रॅश बॅरियर्सचा वापर नाहीच
घाटात ज्या ठिकाणी कठडे नाहीत अशा ठिकाणी क्रॅश बॅरियर्सचा वापर उपयोगी ठरतो; परंतु गेल्या चार पाच वर्षात घाटात एकाही ठिकाणी क्रॅश बॅरियर्सचा वापर करण्यात आलेला नाही. पुर्वी बसविलेले क्रॅश बॅरियर्सही तुटुन पडले आहेत. हे दुरूस्त करण्यासही बांधकाम विभागाकडे वेळ नाही.

कोट्यावधी रूपयांची कामे
घाटरस्ता वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने घाटरस्त्यांसाठी कोट्यावधी रूपयाचा निधी शासनाकडुन दरवर्षी येत असतो; परंतु या कामांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्‍नचिन्ह उभे केले जाते. संरक्षक भिती आणि संरक्षक कठडे बांधकाम केल्यानंतर वर्षभरानंतर कोसळल्याची उदाहरणे देखील आहेत. त्यामुळे कोट्यावधी रूपयाचा निधी जरी येत असला तरी तो दर्जेदार कामांवर खर्च होतो का हा खरा प्रश्‍न आहे. करूळ घाटात विविध कामांसाठी यावर्षी 1 कोटी 5 लाख रूपये खर्च झाला आहे. यातील काही कामे पुर्ण झाली असुन काही प्रगतीत आहेत. तर काही कामे आजमितीस सुरू केलेली नाहीत.भुईबावडा घाटात देखील विविध कामांवर पावणेदोन कोटी रूपये खर्च झाला आहे.

""करूळ आणि भुईबावडा घाटात मंजुर झालेल्या कामांपैकी काही संरक्षक भिंती आणि संरक्षक कठड्यांची कामे पुर्ण झाली असुन काही कामे प्रगतीत आहेत. भुईबावडा घाटात नव्याने क्रॅश बॅरियर्स बसविण्यात येणार आहे. तर रस्त्याकडेला रिप्लेक्‍टरही बसविण्यात येणार आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळल्यास तातडीने हटविण्यासाठी शासनाने जेसीबी उपलब्ध करून दिला आहे.''
- पी. जी. तावडे,
उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडी

""रात्री घाटरस्त्याला मोठी वाहतुक असते. त्यातही घाटातील काही भागात पावसाळ्यात कायम धुके असते. अशा वेळी घाटातुन वाहन चालविणे फार जिकरीचे असते. त्यामुळे रस्त्याकडेला रिप्लेक्‍टर बसविण्यात यावे. याशिवाय रस्ता खचण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधावेत.''
- दीपक खानविलकर,
वाहनचालक,वैभववाडी.

करूळ घाट -

मंजुर कामे - 16, पुर्ण कामे - 14 मंजुर निधी - 72 लाख 50 हजार, खर्च झालेला निधी - 49 लाख 50 हजार,
कामांचा प्रकार - संरक्षक भिंती बांधणे, संरक्षक कठडे बांधणे, कॅटलाईन व रिप्लेक्‍टर बसविणे.

भुईबावडा घाट-

मंजुर कामे - 10, पुर्ण कामे - 6, मंजुर निधी - 4 कोटी 33 लाख, खर्च झालेला निधी - 4 कोटी 10 लाख रूपये.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com