काजळी, उक्षीच्या पुराचा रत्नागिरी तालुक्याला फटका

काजळी,  उक्षीच्या पुराचा रत्नागिरी तालुक्याला फटका

रत्नागिरी - मुसळधार पावसाने रत्नागिरी तालुक्‍याची दाणादाण उडवली. काजळी नदीने धारण केलेल्या रौद्ररुपाचा फटका किनाऱ्यावरील गावांना बसला. चांदेराई मोहल्ला, बाजारपेठेसह हातीस, पोमेंडी, सोमेश्‍वर आणि जुवे, कर्ला येथे पाणी भरल्यामुळे पन्नासहून अधिक घरे पाण्याखाली गेली होती. उक्षी नदीने पातळी सोडल्यामुळे उक्षी गावातील सुमारे दहा ते बारा घरांमध्ये पाणी शिरले होते. पुराचे पाणी घरात घुसल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित व पुरामुळे वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.

दरम्यान, २००५ ला आलेल्या पुराची आठवण किनारी गावातील लोकांनी काढली. सोमवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात रत्नागिरी तालुक्‍यात २२० मि.मी. पावसाची नोंद झाली. काजळी नदीला पूर आला होता. नदीच्या उगमाजवळही पाऊस पडत असल्यामुळे काजळी नदीवरील सगळी धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचे पाणी नदीपात्रातून पुढे जात होते. पाण्याचे लोंढेच्या लोंढे नदीकिनाऱ्यावरील गावांमध्ये घुसू लागले. त्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती.

पहिला तडाखा चांदेराई बाजारपेठेला बसला. बाजारातील सुमारे ३५ हून अधिक दुकानांत पाणी घुसले. पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे चांदेराई मोहल्ल्यात घुसले. किनाऱ्यावरील मशीद अर्धी अधिक पाण्याखाली गेली. आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले. येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तोणदे ग्रामपंचायतीमध्ये पाणी घुसले. हातीस येथील वाणीपेठेतील काही घरांना या पुराचा फटका बसला. पिलणकर, चव्हाण यांच्या घरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सुप्रसिद्ध बाबरशेख दर्ग्यामध्ये पाणी घुसले असून आजूबाजूच्या परिसरातील घरे सायंकाळपर्यंत पाण्याखाली गेली होती.

काजळीचे पाणी पोमेंडी गावातही घुसले होते. येथील सुरेश पवार, पांडुरंग कांबळे, मारुती रहाटे, शरद नागवेकर, संतोष पवार यांच्यासह सहा घरांचे पुराचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे. टीव्ही, कपाट, बेड यासह कपडे वाहून गेले आहेत. सोमेश्‍वर येथील रोहीदास पिलणकर, भारती पिलणकर, उदय भाटकर, सुरेश फणसेकर, साईनाथ पिलणकर, भगवान कलये यांच्या घरात पाणी घुसले होते. मध्यरात्री भरती सुरू झाल्यानंतर काजरघाटीत पाणी भरून लागले आणि ते १० फुटापर्यंत चढले. अनेकांनी घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले होते. पोमेंडी येथील रेशनदुकानात पाणी घुसल्यामुळे धान्य भिजल्यामुळे नुकसान झाले. 

जिल्हाधिकाऱ्यांची पोमेंडीला भेट, तहसीलदरांकडून पाहणी
रत्नागिरीतून चांदेराईकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प होती. हरचिरी येथील मशिदही पाण्याखाली गेलेली होती. दरम्यान, ता. ४ रोजी रात्री पावसामुळे केळ्ये-मजगाव येथील दोन कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सकाळी ७ वाजता पोमेंडी गावाला भेट दिली. या मार्गावर अडकलेल्या लोकांना त्यांनी रत्नागिरीत आणून नाश्‍ताही दिला. तहसीलदार शशिकांत जाधव यांनीही पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तालुक्‍यात ठिकठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

खाडी, समुद्रालाही भरती
खाडीच्या भरतीचे पाणी कर्ला-जुवे गावाच्या बंधाऱ्यावरुन गेले. अशी परिस्थिती प्रथमच उद्‌भवल्याचे ग्रामस्थ सुजित कीर यांनी सांगितले. भरतीमुळे जुवे गावातील दहा घरांमध्ये पाणी गेले होते. त्यातील लोकांना अन्यत्र नेण्यात आले. समुद्राच्या भरतीने मांडवीतील दोन घरात पाणी घुसल्याने त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. 

वीस वर्षांनी कशेळीला पाण्याचा वेढा
राजापूर तालुक्‍यातील कशेळी गावाला अर्जुना नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प होती. अडकलेल्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी होडीचा वापर करण्यात आला. दोन होड्यांद्वारे लोकांना एका बाजूने दुसरीकडे नेण्यात येत होते. एसटीच्या गाड्या कशेळी गावातच अडकून पडलेल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com