कणकवलीत सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर

कणकवली - शहरातील बाजारपेठेच्या मागील भागातील कॉम्प्लेक्‍समध्ये साचून राहत असलेले सांडपाणी.
कणकवली - शहरातील बाजारपेठेच्या मागील भागातील कॉम्प्लेक्‍समध्ये साचून राहत असलेले सांडपाणी.

कणकवली - शहरातील अनेक कॉम्प्लेक्‍समध्ये सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या इमारतींच्या परिसरात असलेले शोषखड्ड्यांमध्ये पाणी मुरण्याची क्षमता संपली आहे. यामुळे हे सांडपाणी सखल भाग तसेच इमारत परिसरात साठून राहते, यामुळे दुर्गंधी आणि डासांचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

शहरातील सांडपाण्याचा निचरा लगतच्या गटारांमधून होतो. परंतु गटारातून सांडपाणी वाहू देण्यास अनेक नागरिकांचा आक्षेप असल्याने पावसाळा वगळता ही गटारे बंद केली जातात. त्यामुळे त्या त्या भागातील इमारतींच्या परिसरातच सांडपाणी साचून राहत आहे.

शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव नगरपंचायतीने पाच वर्षापूर्वीच राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविला होता. मात्र या भुयारी गटार योजनेसाठी किमान ३५ कोटींचा खर्च येणार आहे. एवढा खर्च ‘ब’ वर्गातील नगरपालिकांना उपलब्ध होऊ शकतो. कणकवली नगरपंचायत ‘क’ वर्गात असल्याने भुयारी गटार योजनेसाठीही निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याची अडचण नगरपंचायतीसमोर आहे. या सर्व त्रांगड्यात सांडपाण्याचा त्रास सहन केल्याशिवाय शहरातील नागरिकांना पर्याय राहिलेला नाही.

कणकवली शहरात शिवाजीनगर येथील निसर्ग अपार्टमेंट परिसरातील विहिरी सांडपाणी साठून राहिल्याने प्रदूषित झाल्या होत्या. यानंतर परबवाडी भागातील कामत सृष्टी भागातील विहिरी सांडपाण्याचा निचरा न झाल्याने दूषित झाल्या. त्या पाठोपाठ कनकनगर, बाजारपेठेचा मागील भाग व शहरातील अन्य प्रभागातील विहिरी दूषित होऊ लागल्या आहेत. 

नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील सांडपाण्याबाबत नगरसेवकांनी आवाज उठवला होता. मात्र नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्‍नी असमर्थता दर्शवली. शहरात निवासी संकुले उभारणी करताना त्या संकुलातील सांडपाणी तेथेच खड्डा खोदून मुरविण्याचे निर्देश नगरपंचायतीकडून दिले जातात. मात्र शोषखड्ड्यांची पाणी धारण करण्याची क्षमता संपल्याने हे पाणी सखल भागात वाहून जात आहे. भुयारी गटार योजना नसल्याने हे सांडपाणी सखल भागात साचून राहते अशी खंत देखील मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली होती.

नागरिकांची कोंडी
निवासी संकुलांमधील सांडपाणी निचऱ्याबाबत संकुलांचे विकासक लक्ष देत नाहीत. नगरपंचायतीकडे तक्रार करून प्रशासन आणि पदाधिकारीही सांडपाणी निचरा करण्याकडे लक्ष देत नाहीत. 

परबवाडीप्रमाणेच इतर भागातही पर्याय हवा
शहरातील परबवाडी कामत सृष्टी परिसरात सांडपाणी गटारामध्येच तुंबून राहत असल्याने अनेक विहिरी दूषित झाल्या होत्या. यावर पर्याय म्हणून परबवाडी, कनकनगर, रेल्वे स्टेशन ते गडनदीपात्रापर्यंत सध्या बंदिस्त गटार व्यवस्था केली जात आहेत. या गटारामध्ये सांडपाणी निचरा केला जाणार आहे. याच धर्तीवर प्रत्येक प्रभागात बंदिस्त गटार व्यवस्था व्हावी, अशी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com