गुणवत्तेद्वारे गरिबीवर मात करा - राणे

कणकवली - दहावी बारावीतील जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन गौरविताना नारायण राणे सोबत नीलम राणे, दत्ता सामंत, सतीश सावंत आदी.
कणकवली - दहावी बारावीतील जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन गौरविताना नारायण राणे सोबत नीलम राणे, दत्ता सामंत, सतीश सावंत आदी.

कणकवली - जगाची प्रगती ही तंत्रज्ञानावर झाली आहे. चीन देश जगाच्या बाजारात सर्वाधिक उत्पादन करतो. ही प्रगती त्या देशाच्या बुिद्धमत्तेची आहे.

आपला देश महासत्ता बनण्यासाठी स्वतःचे कुटुंब गरिबीतून बाहेर काढण्याची गरज असते. गरिबीवर मात करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या गुणवत्तेचा उपयोग करून मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांबरोबरच उद्योजक बना असे आवाहन काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात केले. 

जिल्हा काँग्रेस आणि तातू राणे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दहावी बारावीत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यासह शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार या वेळी करण्यात आला. यंदा बारावीतील तीन विद्यार्थी तर दहावीतील १९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप तसेच कल्पवृक्ष देऊन गौरविण्यात आले. गेली २७ वर्षे श्री.राणे हे जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार करीत आहेत. येथील एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत या सत्कार कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा निलम राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता सामंत, महिलाध्यक्षा प्रणिता पाताडे, बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, प्रियांका राणे, सरोज परब, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत, सभापती भाग्यलक्ष्मी साटम, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना श्री. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात जो निकाल लागत आहे ते यश पाहिल्यानंतर मोठे समाधान वाटते. त्याचा आनंदही फार वेगळा असतो. याचे कारण जिल्ह्यात आमदार म्हणून १९९० ला आलो. त्यावेळची आणि आताची शैक्षणिक प्रगती फारच वेगळी आहे. जिल्ह्याच्या प्रगतीचे खरे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. 

गेल्या २५ वर्षापासून आपण ज्या ज्या शाळांच्या स्नेहसंमेलनात जात होतो त्यावेळी शिक्षकांना जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी घडले पाहिजे असे आवाहन मी करत होतो. त्यावेळेपासून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार हा बोध घेण्यासाठी आपण सुरू केला. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच कृषी आणि प्रक्रीया उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. येथील विद्यार्थी जेव्हा भूमीपुत्र म्हणून मोठा व्यावसायिक बनेल तेव्हा खरे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे येत्या काळात तंत्रज्ञानाचा अभ्यास करून मोठे यश मिळवावे लागेल. तुमच्याकडे असलेली गुणवत्ता सिद्ध झाली पाहिजे. या उद्देशाने हा सत्कार आहे. पूर्वी नॉनमॅट्रीक झालेली मुलं सरकारी नोकरीत जात असत. पण आज काळ बदलला आहे. याच अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक विद्यार्थीनी मुंबई मेट्रोची जनरल मॅनेजर आहे.

यशाची पाठलाग करण्यासाठी मोठे ध्येय अंगी बाळण्याचे मतही त्यांनी  व्यक्त केले. तसेच डॉन बॉस्को हायस्कूलच्या तन्वी कदम हिने आपल्या मनोगतात आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. यावेळी प्रणिता पाताडे, दत्ता सामंत, सतीश सावंत, विकास सावंत यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com