रत्नागिरी - अतिवृष्टीमुळे राज्यातील नवीन कांदा पिकाचे झालेले नुकसान, तुलनेने कमी प्रमाणात जुना कांदा उपलब्ध आणि परराज्यातून असलेल्या मागणीमुळे कांद्याचे भाव कडाडले आहेत. जूनमध्ये 10 रुपये किलोने मिळणाऱ्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून दर्जाप्रमाणे किलोचा भाव 80 रुपयावर गेला आहे. उद्या तो 100 रुपये किलो होणार असल्याने कांदा रडवणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात कांदा 10, 15 ते 20 रुपये किलो भावाने मिळत होता. मात्र, अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला. नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होता. मात्र, पावसामुळे 50 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्यात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहणार आहेत. जुना कांदा तुलनेने कमी आहे. त्यापैकी 50 ते 60 टक्के माल निकृष्ट दर्जाचा आहे. कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील कांद्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. सुकलेल्या आणि वाळलेल्या कांद्याला त्या राज्यातून मागणी आहे. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात मागणी आणि तुलनेत आवक कमी आहे. त्यामुळे दर्जाप्रमाणे 80 रुपये किलोवर गेलो आहे. उद्या किलोचा भाव 100 रुपये होणार आहे. रत्नागिरीत कोल्हापूर, सांगलीतून कांदा येत असून तो रस्त्यावर 10 ते 20 रुपये किलोमागे कमी असल्याने मोठ्या प्रमाणात उचलला जात आहे.
आर्थिक बजेट कोलमडले
कोरोना महामारीच्या संकटातून सावरता सावरता अस्मानी संकटाचा मोठा परिणाम पाले-भाज्यांवर झाला आहे. ढबू मिरची 60 किलो, वांगी 70 रुपये किलो. गवार 85 किलो, टोमॅटो 50 रुपये किलो, फरसबी 100 रुपये तर बटाटा 50 रुपये किलोवर गेला आहे. कोथिंबीर 30 रुपये पेंढी झाली आहे. भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. रत्नागिरी कर्नाटक, बेळगाव, सांगली आदी भागातून येणाऱ्या भाज्यांची आवकही कमी झाली आहे. स्थानिक भाजी-पाल्यावरही पावसाचा मोठा परिणाम झाल्यामुळे कांद्याबरोबर भाजीपालाही कडाडला आहे.
कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात रत्नागिरीत कांदा येतो. मात्र ही आवक सातत्याने घटत आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने 80 रुपये किलो कांदा झाला आहे. दर मिळण्यासाठी साठवणुक सुरू असल्याने उद्यापासुन 100 रुपये किलोने कांदा होणार आहे.
- ज्योतिबा विरंगुळे, भाजी व्यापारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.