कोळंब पुलावरून स्वाभीमान-शिवसेनेत खडाजंगी

कोळंब पुलावरून स्वाभीमान-शिवसेनेत खडाजंगी

मालवण - कोळंब पुलावरून सुरू असलेल्या वाहतुकीच्या विषयावरून आज स्वाभीमान व शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कोळंब पुलासह घरबांधणीची परवानगी ग्रामपंचायतीमार्फतच मिळणार असे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मात्र अद्याप ग्रामपंचायतीकडून अशीच परवानगीच मिळत नसल्याने आमदारांनी जनतेची घोर फसवणूक केला असल्याचा आरोप पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर यांनी आज पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, अजिंक्‍य पाताडे, विनोद आळवे, कमलाकर गावडे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, छाया परब, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

कोळंब पुलावरून 1 मे पासून वाहतूक सुरू होईल, असे बांधकामच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते; मात्र अद्याप हे पूल वाहतुकीसाठी खुले झालेले नाही. केवळ दुचाकी सुरू झाली असली तरी संपूर्ण वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे आमदार केवळ फोटो काढून वाहतूक सुरू झाल्याचा दिखावा करत आहेत. प्रत्यक्षात अद्यापही अधिकृत वाहतूक सुरू झालेली नाही त्यामुळे आमदार नाईक हे केवळ स्टंटबाजी करत असल्याचा आरोप गटनेते सुनील घाडीगावकर यांनी केला.

यावर पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर यांनी या पुलावरून दुचाकी वाहतूक सुरू असल्याचे सांगताच घाडीगावकर, परुळेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सिमेंटच्या पोत्यांवरून दुचाकींची वाहतूक होत असून यात एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी शासन घेणार का? असा प्रश्‍न केला. त्यामुळे सध्या पुलावरून सुरू असलेली वाहतूक ही अनधिकृतच असल्याचा आरोप श्री. घाडीगावकर यांनी केला.

यावर सार्वजनिक बांधकामचे अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी येत्या 15 तारखेपर्यंत पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार असून त्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू होण्यासाठी आवश्‍यक चाचणी केली जाणार आहे. या चाचणीनंतर हे पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुले केले जाणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले.

भूमीपूजने करून केवळ स्टंटबाजीच
वराड-कुडाळ तालुक्‍यातील सोनवडे गावाला जोडणाऱ्या कर्ली खाडीवरील पुलाच्या कामाचे भूमीपूजन होऊन दोन तीन महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र अद्याप या पुलाच्या कामाला का सुरवात झाली नाही असा प्रश्‍न घाडीगावकर, परुळेकर, आळवे यांनी उपस्थित केला. यावर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी हे काम कुडाळ विभागात येत असून याची सविस्तर माहिती ते देऊ शकतात. पर्यावरणाचा दाखला न मिळाल्यानेच या पुलाचे काम रखडल्याचे स्पष्ट करताच खासदार, आमदार केवळ भूमीपूजने करत सुटले असून ते केवळ स्टंटबाजीच करत असल्याचा आरोप श्री. घाडीगावकर यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com