दापोली गारठले; तापमान 4.5 अंशांवर

Dapoli
Dapoli

दाभोळ : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्‍त वाऱ्यांचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम कोकणचे महाबळेश्वर मानल्या जाणाऱ्या दापोलीतही मोठया प्रमाणात जाणवला असून दापोलीचे तापमान काल रात्री 4.5 अंश इतके नीचांकी नोंदविले गेले असून दापोली तसेच परिसरातील गावातील नागरिकही या थंडीने कुडकुडले आहेत. 

5 फेब्रुवारीपासून वातावरणात मोठया प्रमाणात बदल घडत असून 5 फेब्रुवारी रोजी कमाल 34.2 अंश तर किमान तापमान 14.5, 6 रोजी 33.4 / 15.5, 7 रोजी कमाल 30 तर किमान 10 अंश सेल्सीअस , 8 रोजी कमाल 28 तर किमान 12 तर आज 9 फेब्रुवारी रोजी ते कमाल 26.4 तर किमान नीचांकी असे 4.5 अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले. तापमानातील या बदलामुळे सर्वजण चक्रावून गेले आहेत. गेल्या अनेक वर्षानी इतकी कडाक्‍याची थंडी काल अनुभवण्यास मिळाली असल्याचे गिम्हवणे येथील ज्येष्ठ नागरिक भास्करतात्या जोशी यांनी सांगितले. 

गेले दोन दिवस दुपारपासूनच गार वारे सुटत असल्याने वातावरणात चांगला गारवा होता. काल सायंकाळी 5 वाजल्यापासूनच थंडीची सुरवात झाल्याने सायंकाळी 6 वाजल्यापासूनच लोकांनी स्वेटर्स तसेच जर्कीन घालावे लागले. मध्यरात्री थंडीचा कडाका वाढला होता त्यामुळे अनेकांनी या गुलाबी थंडीचा आनंद लुटला. यापूर्वी दापोली येथे 2 जानेवारी 1991 मध्ये नीचांकी असे 3.4 अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविले गेले होते तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी रोजी 91 रोजी ते 3.7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची नोंद असल्याची माहिती कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोरे यांनी दिली आहे. यावर्षी 25 जानेवारी 19 रोजी 9 अंश तर 26 जानेवारी रोजी 8 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदविण्यात आले होते. आज सकाळी 11 वाजेपर्यंत दापोली परिसरात थंडी कायम होती त्यामुळे आज रात्रीही जोरदार थंडी पडण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात आली आहे. 

'आम्ही मुंबई येथून गिम्हवणे येथे आमच्या गावी माघी गणेशोत्सवासाठी आलो असून उत्सवाचे निमीत्ताने आमच्या आळीत काल रात्री नाटकाचा प्रयोग होता त्यामुळे पहाटे तीन वाजेपर्यंत आम्ही घराबाहेरच असल्याने आम्हाला या गुलाबी थंडीचा आनंद घेता आला. आमच्या गावी इतकी थंडी पहिल्यांदाच मला अनुभवायला मिळाली. 
या थंडीचा आनंद आम्ही सर्व मित्रांनी शेकोटी पेटवून घेतला.' 
- केदार पेंडसे, गिम्हवणे 

'पुढील चार दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहणार असून थंडीबरोबर वारा असल्यास आंब्याची फळगळ वाढणार आहे तर ज्या आंब्याच्या व काजूच्या झाडांना मोहोर आलेला नाही त्यांना या वातावरणाचा फायदा होऊन नवीन मोहोर येईल. आंब्याची फळगळ कमी करण्यासाठी झाडाला 100 ते 200 लिटर पाणी घालावे व 1 किलो सुफला हे मिश्र खत द्‌यावे' 
- डॉ. बी. आर. साळवी, प्रमुख, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्‌यालय दापोली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com