गुहागर - ‘‘वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे प्रसारमाध्यमे मोठ्या स्थित्यंतराला सामोरी जात आहेत. या काळात पत्रकारांनी विद्यार्थी बनून प्रयोगशील पत्रकारिता करणे आवश्यक आहे’’, असे मत सकाळ माध्यम समूहाचे सल्लागार संपादक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले. चिपळूणमध्ये पत्रकारांच्या
राज्यस्तरीय संमेलनात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ऑल जर्नालिस्ट ॲण्ड फ्रेंड्स सर्कल या संस्थेचे १३ वे राज्यस्तरीय संमेलन सुरू झाले. यावेळी अरणकल्ले म्हणाले की, १० वर्षांपूर्वी प्रिंट मीडियाचा प्रभाव होता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रभावी होता. मात्र गेल्या तीन वर्षात सोशल मीडिया, सिटीझन जर्नालिस्ट, डिजिटल मीडिया असे पत्रकारितेचे क्षेत्र व्यापक होत चालले आहे. अचूक शब्दांसोबत प्रतिमांचा योग्य वापर केलेल्या इसापनीतीमधील कथांप्रमाणे बातमी प्रभावी झाली पाहिजे. त्यासाठी अभ्यास, संशोधन, संदर्भ, ग्राफिकल ॲनालेसिस यांचा वापर करून नावीन्यपूर्ण विषय हाताळले पाहिजेत. समाजात डोळसपणे पाहिले, तर असे अनेक विषय आपण लिहू शकतो.
उद्घाटनाला पालकमंत्री वायकर, खासदार राऊत, आमदार चव्हाण, प्रसाद लाड, नगराध्यक्षा सौ. खेराडे, पत्रकार समीरण वाळवेकर, विश्वास मेहेंदळे, जतिन देसाई, भालचंद्र दिवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दै. सागर, रत्नागिरी टाइम्स, रत्नभूमीच्या संपादकांचा सत्कार करण्यात आला. तसेच संमेलनाच्या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धा व छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देण्यात आले.
रोबोकडूनही बातम्या संपादित
आता रोबोदेखील बातम्या संपादित करू लागला आहे. बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे स्वागत करणे ही अपरिहार्यता आहे. त्यामुळे प्रश्न मांडणारी पत्रकारिता सोडून उत्तरे शोधणारी, लोकसमूह जोडणारी, भविष्याचा वेध घेणारी पत्रकारिता आवश्यक आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.