शेतीपंप वीज जोडण्यांसाठी भास्कर जाधव आक्रमक 

शेतीपंप वीज जोडण्यांसाठी भास्कर जाधव आक्रमक 

रत्नागिरी - राज्यपालांच्या अभिभाषणात कोकणला स्थान नाही, यावरुन विधानसभेत आक्रमक झालेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हयातील शेतीपंपाच्या वीजजोडणीचा प्रलंबित प्रश्‍न तडीस नेला. विधानसभेत उर्जामंत्र्यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे, ती योग्य असल्याचे सिध्द करून दाखवा अन्यथा हक्कभंग आणण्याचा इशारा दिल्यानंतर यंत्रणा हलली. 

जाधव यांनी मांडलेल्या मुद्‌द्‌यांची दखल घेत जिल्ह्यातील प्रलंबित शेतीपंपाच्या वीज जोडण्या तात्काळ देवूच,शेतीपंपांना वीज जोडणीचा अनुशेषही भरून काढू,असे आश्‍वासन दिले. 
विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात शेतीपंपाना जोडणी देण्याच्या विषयावरून आमदार जाधव आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात झालेल्या आव्हान-प्रतिअव्हानाची चर्चा थेट रत्नागिरीपर्यंत रंगली. सोशल मीडीयावरही आक्रमक जाधवांच्या भाषणाला चांगला प्रतिसाद मिळत होता.

गेली 25 वर्ष विधानसभा गाजवणाऱ्या जाधव यांनी अनुभवाची झलक सर्वच आमदारांना दाखवून दिली. शेतीपंप वीज जोडणीचा लाभ देण्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री बावनकुळेंनी राज्यात कुठेही शेतीपंप जोडणी शिल्लक नाही, असे सभागृहात सांगितले. आमदार जाधव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत रत्नागिरी जिल्हयात शेकडो जोडण्या प्रलंबित असल्याचे सांगितले.यावर बावनकुळेंनी माझ्याकडे जी माहिती आहे, त्यात रत्नागिरी जिल्हयातील एकही जोडणी शिल्लक नाही, असे ठामपणे सांगितले. या प्रश्नावर अन्य सदस्य चर्चा करीत असतानाच आमदार जाधव यांनी जिल्हयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून एसएमएसद्वारे माहिती मागवली. त्यात 616 जोडण्या प्रलंबित असल्याचे पुढे आले.अधिकृत माहिती मिळाल्यानंतर जाधव आक्रमक होत म्हणाले, 616 जोडण्या प्रलंबित असल्याची माझ्याकडे अधिकृत माहिती आहे. ही माहिती खोटी आहे का ते सांगा नाहीतर मी आपल्यावर हक्कभंग आणतो. राष्ट्रवादीचे जयंत पाटील उठले. त्यांनी त्यांच्या दाव्याला दुजोरा देत म्हणाले, मंत्रीमहोदय लवकर निर्णय घ्या. भास्करराव आहेत ते. 

चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी बावनकुळेंनी आमदार जाधव यांना दालनात बोलावून रखडलेल्या 616 शेतीपंप जोडण्या तत्काळ देत असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरी जिल्हयाचा 3 हजार शेतीपंपांच्या जोडण्यांचा अनुशेष आहे. त्यात शेतकऱ्यांना अर्ज करायला सांगा, त्याही जोडण्या ताबडतोब देवू, असे सांगितले. 

भास्कर जाधवांची खंत 
ज्या शेतकऱ्यांना शेतीपंपाची आवश्‍यकता आहे, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज करा. त्याची एक प्रत माझ्याकडे पाठविल्यास त्यांना तात्काळ जोडणी मिळवून देऊ, असे आवाहन करतानाच जाधव म्हणाले, जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित होत असताना अन्य आमदारांनी त्याला दुजोरा दिला पाहिजे होता; मात्र तसे होत नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com