राजापूर - नाणार रिफायनरी प्रकल्पाला झालेल्या विरोधामुळे तो थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रकल्पाला असलेले समर्थन पाहून रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर प्रकल्पसमर्थकांनी रिफायनरी झालीच पाहिजे, अशी एकच जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सायंकाळी राजापुरात आली. नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेल्या समर्थनाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जावे, यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नाणारवासीयांनी रिफायनरी समर्थनाचे फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मग तोच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही दिली.
'मी वारंवार सांगत होतो, की नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिजे. ही ग्रीन रिफायनरी आहे. यातून एक लाख तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे कोकणचा कायापालट होणार आहे. मात्र, या प्रकल्पाला ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही तो थांबविला. मात्र, आजचा तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. यासाठी लवकरच चर्चा करू,'' अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
|