कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर : ही बातमी वाचाच

National Marine Highway delopment plan in malvan kokan marathi news
National Marine Highway delopment plan in malvan kokan marathi news

मालवण (सिंधुदुर्ग) : पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करताना राज्य शासनाच्या माध्यमातून कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 376 किलोमीटरच्या सागरी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आता हा सागरी महामार्ग राष्ट्रीय सागरी महामार्ग बनविला जाणार असून त्याचा डीपीआर महामार्ग प्राधीकरणने केंद्र शासनाला मंजूरीसाठी सादर केला आहे. केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर अस्तित्वातील सागरी महामार्गाची रुंदी आणखी वाढणार असून वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. 

गेल्या काही वर्षात कोकणातील पर्यटन वाढीस लागले आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई-गोवा हा एकमेव महामार्ग असल्याने या महामार्गावर सातत्याने ताण पडत असल्याचे दिसून येत होते. शिवाय अपघातांची संख्याही वाढत होती. त्यामुळे महामार्गावरील हा ताण कमी करण्याबरोबरच वाढते पर्यटन आणि सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सागरी महामार्गाची निर्मिती 20 वर्षापूर्वी करण्यात आली.

149 किलोमीटर सागरी महामार्गाचे काम पूर्ण

यात राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 149 किलोमीटर सागरी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. यात कुंभारमाठ येथील चारशे मीटरचे काम न्यायप्रविष्ठ बाबीमुळे अडकले आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात 227 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून 11 किलोमीटरचे काम प्रलंबित आहे. सिंधुदुर्गातील सागरी महामार्गावर सुमारे तेरा पुलांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सुमारे दहा पुलांचा समावेश आहे. 
गेल्या काही वर्षात सागरी महामार्गाचा वापर पर्यटकांबरोबर अन्य वाहतुकीसाठीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय सागरी महामार्ग बनविण्याचा डीपीआर

मात्र सागरी महामार्ग हे महामार्गाएवढे बनविण्यासाठी राज्य शासन पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे महामार्ग प्राधीकरणने राष्ट्रीय सागरी महामार्ग बनविण्याचा डीपीआर बनविला असून तो मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. या डीपीआरमध्ये खाडीक्षेत्रालगतच्या काही पुलांचाही समावेश आहे. राष्ट्रीय सागरी महामार्ग बनविताना सध्या अस्तित्वात असलेल्या सागरी महामार्गालगतच्या जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यामुळे या राष्ट्रीय सागरी महामार्गाची रुंदीही वाढणार आहे. केंद्र शासनाची या डीपीआरला मंजूरी मिळाल्यास मुख्य महामार्गाबरोबरच किनारपट्टी भागातील राष्ट्रीय सागरी महामार्गही मोठा होणार असून यामुळे वाहतूकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. 

हेही वाचा-   खुशखबर : राज्यात होणार सायबर, क्रीडा विद्यापीठ : उदय सामंत ​
पर्यटन विकासाला चालना : आदित्य ठाकरे 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की कोकण विभागाच्या पर्यटन विकासास निधी उपलब्धतेसाठी एशिएन डेव्हलपमेंट बॅंकेकडे आराखडा सादर करण्यात आला होता; मात्र बॅंकेमार्फत मंजुर करण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या बाबींमध्ये पर्यटन ही बाब अग्रक्रमी नसल्याचे बॅंकेने कळविले आहे. कोकणच्या पर्यटन विकासासाठी आराखडा असून स्थानिकांना रोजगार, समुद्र किनारे, हॉटेल याबाबत धोरण तयार करत आहे. कोकणात आता पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तसेच चिपी विमानतळ अंतिम टप्प्यात आहे. सागरी महामार्गाचाही पर्याय आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. 

वित्तीय संस्था प्राधान्य

पायाभूत सुविधांसाठी वित्तीय संस्था निधी देते. सागरी महामार्गाच्या कामाला अशा निधीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल. यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील. शिवाय प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येतील. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com