काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय नारायण राणे ठरवतील - नीलेश राणे

काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय नारायण राणे ठरवतील - नीलेश राणे

रत्नागिरी - काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर स्वाभिमान आघाडी करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष नारायण राणे यांचा आहे; मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ९९ टक्‍के मीच उमेदवार असेन, असा विश्‍वास माजी खासदार नीलेश राणेंनी व्यक्‍त केला. 

पत्रकारांशी संवाद साधताना नीलेश म्हणाले, राजकीय गणिते निवडणुकीवेळी ठरवण्यात येतात. स्वाभिमान पक्ष सध्या आपले काम करत आहे. येत्या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी लोकांपर्यंत पोचण्याचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन पक्षाची धोरणे पोचवित आहोत. नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निकालांवरून लोकांना गृहीत धरून चालणार नाही, हे सर्वांच्याच लक्षात आले आहे. तेथे मिळालेले यश हे राहुल गांधींमुळे नव्हे, तर स्थानिक पातळीवर लोकांच्या विरोधी मतप्रवाहांमुळे आहे. जागांमधील फरक मोठा असतो, तर ते श्रेय राहुल यांचे म्हणता आले असते.

राम मंदिरचा मुद्दा घेऊन शिवसेना, भाजप सामोरे गेले तरीही त्यांना त्याचा फायदा होणार नाही. लोकांना विकास हवा आहे. महाराष्ट्रात १८२ गावांत दुष्काळी स्थिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरला भेट देण्यासाठी दिल्लीत जाण्याऐवजी मराठवाड्यात एक टॅंकर घेऊन जायला पाहिजे होते, असा चिमटाही त्यांनी काढला.

आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकेल
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकेल, असा विश्‍वास नीलेश यांनी व्यक्‍त केला. ते म्हणाले की, मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे तो ग्राह्य धरला जाऊ शकतो; मात्र त्याचे श्रेय नारायण राणेंचेच आहे. राणे समितीने २०१४ ला तयार केलेल्या अहवालानुसार कार्यवाही सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com