कासवांच्या 100 पिल्लांची समुद्राकडे धाव; गावखडी किनार्‍यावर संवर्धन

कासवांच्या 100 पिल्लांची समुद्राकडे धाव; गावखडी किनार्‍यावर संवर्धन

पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी कासवांच्या 100 पिल्लांनी समुद्राकडे धाव घेतली. निसर्गयात्री, वन विभाग आणि गावखडी ग्रामपंचायतीने कासवांच्या अंड्यांचे संरक्षण केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

निसर्गयात्री संस्था व रत्नागिरी वन विभागाच्या कासव बचाव मोहिमेंतर्गत अनेक कासवांना जीवदान देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कासवांच्या अंड्यांची तस्करी कमी झाली आहे. गावखडी समुद्रकिनार्‍यावर अनेक वेळा कासवांची अंडी सापडतात. ती संरक्षित करण्याचे काम संस्थेचे कार्यकर्ते करतात. नोव्हेंबरमध्ये निसर्गयात्री संस्थेचे कार्यकर्ते प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील, आशुतोष अभ्यंकर यांना समुद्रकिनारी कासवाची अंडी सापडली होती. ती त्यांनी संरक्षित केली. शनिवारी (ता. 12) या अंड्यातील पिल्ले बाहेर पडल्यानंतर त्यांना पहाटे समुद्रात सोडण्यात आले. एकूण 100 पिल्लांनी किनार्‍यावरून समुद्राकडे धाव घेतली. आणखी काही पिल्ले घरट्यात संरक्षित करण्यात आली आहेत. दोन वर्षापासून कासव बचाव मोहिमेने वेग घेतला आहे. अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेकांचे योगदान मिळत आहे. गावखडी येथे ग्रामस्थांच्या सहभागामुळे ही मोहीम यशस्वी करण्यामध्ये निसर्गयात्रीचे योगदान मोठे आहे. 

गेली तीन वर्षे आमची संस्था काम करीत असून गेल्या दोन वर्षात 600 पिल्ले संरक्षित करून समुद्रात सोडली आहेत. जागतिक स्तरावर ऑलिव्ह रिडले ही जात धोक्यात आली आहे. कारण समुद्रातील वातावरणात होणारा बदल, मासेमारीच्या जाळीत अडकून मरण्याचे प्रमाण आणि काहीजण ही अंडी खाण्यासाठी वापरत असल्यामुळेच कासव बचाव मोहीम या भागात तीन वर्षे राबवित आहोत.

- प्रदीप डिंगणकर, कार्यकर्ता, निसर्गयात्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com