रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतींच्या मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी 150 कोटी रुपये रोखीने प्रदान करण्यात आले आहेत. यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात अडचण येणार नाही. गुरुवारी (ता. 9) यासंदर्भातील शासन निर्णय जारी झाला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारा राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार विविध प्रवाशांना प्रवासी भाड्यात सवलती दिल्या जातात. यामध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती या प्रवाशांना सवलती दिल्या जातात. या खर्चाची प्रतिपूर्ती 1 एप्रिल 2016 पासून गृह (परिवहन) विभागाद्वारे करण्याबाबत 25 फेब्रुवारी 2016 ला शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता.
2019-20 वर्षातील सवलतींच्या मूल्यांपैकी काही रक्कमेची प्रतिपूर्ती रोखीने तसेच काही रकमेची प्रतिपूर्ती प्रवासी कराच्या समायोजनाद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास करण्यात आली आहे. काही रक्कम प्रलंबित राहिली आहे. या प्रलंबित रक्कमेपैकी 150 कोटी रुपये रोखीने प्रतिपूर्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याचा निर्णय गुरुवारी झाला. हा खर्च 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागवण्यात येणार आहे. हा शासन निर्णय वित्त विभागातर्फे गृह विभागाचे अवर सचिव द. ह. कदम यांनी काढला आहे.
17 कोटींचे उत्पन्न बुडाले
रत्नागिरी एसटी विभागाचे 22 मार्चपासून आजपर्यंत सुमारे 17 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. राज्यात सर्वत्र एसटी थांबल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य शासनाने एसटीला बुस्टर दिला आहे. आजपासून तीन दिवस बॅंकांना सुट्टी असल्याने आता सोमवारी (ता. 13) पगार होतील, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.