रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन
पेण - कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी नुकतीच राज ठाकरे यांची मुंबईतील "कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायासंबंधीचे निवेदन त्यांना दिले. याबाबत लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंशी चर्चा करण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांना दिले.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या कोकण रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे यांची भेट घेतली. या विषयाकडे लक्ष देणे हे स्थानिक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य होते, असे राज म्हणाले.
कोकण रेल्वेसाठी 1976 पासून भूसंपादन सुरू झाले. तेव्हापासून कोकण रेल्वे प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यांत धूळफेक करत आले आहे. कोकण रेल्वेचे आपटा ते रोहा व रोहा ते मंगलोर असे दोन भाग करण्यात आले. रोह्यापासून पुढील प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळत आहे आणि आपटा ते रोहा दरम्यानच्या प्रकल्पग्रस्तांना मात्र नोकरी मिळत नाही. दोन्हीकडील प्रकल्पग्रस्तांकडे प्रकल्पग्रस्त म्हणून कोकण रेल्वेने नोकरीसाठी दिलेला दाखला आहे. दिल्ली येथील रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनाही याची माहिती नाही. नोकरीसाठी भेदभाव करून परप्रांतीयांना नोकरी देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
'या विषयाकडे लक्ष देणे हे स्थानिक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य होते,'' असे ठाकरे म्हणाले.
|