मुंबई - गोवा महामार्गावर कणकवलीत पुन्हा खड्डे 

मुंबई - गोवा महामार्गावर कणकवलीत पुन्हा खड्डे 

कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कणकवली दौऱ्यानंतर शहरातील मुंबई गोवा महामार्ग पुन्हा खड्डेमय झाला आहे. जानवली पुलावर तर खड्‌डेच खड्डे असल्याने सतत अपघातांची शक्‍यता निर्माण होत आहे. याखेरीज महामार्गालगतचा सर्व्हिस रोडचा वापर पार्किंगसाठी होतोय. तर महामार्गालगतची अतिक्रमणे कायम असल्याने वाहन चालकांना खड्ड्यातून जावे लागत आहे. 

कणकवली शहरात महामार्गावर खड्ड्यांची समस्या तीव्र झाल्यानंतर स्वाभिमान संघटनेने अभियंत्यांवर चिखलफेक आंदोलन केले. त्यानंतर तातडीने खारेपाटण ते कुडाळ हद्दीपर्यंतच्या जुन्या महामार्गावरील तसेच पर्यायी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. त्यानंतर 15 जुलै रोजी पालकमंत्री केसरकर यांनी खारेपाटण ते झाराप दौरा केला. यावेळी त्यांनी महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश ठेकेदार आणि हायवे अधिकाऱ्यांना दिले होते; मात्र पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही महामार्गावरील खड्डे बुजविले नाहीत. त्यामुळे सध्या जानवली नदी ते गडनदी पुलापर्यंत महामार्ग खड्डेमय झाला आहे. 

शहरात एस. एम. हायस्कूल ते तेलीआळी डीपी रोड तसेच प्रांत कार्यालय ते गडनदीपुलापर्यंतचा मार्ग धोकादायक झाला होता. या मार्गावर भर पावसातच डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावर आता पुन्हा खड्ड्यांची समस्या निर्माण झाली आहे. तर जानवली पुलावरील खड्डे बुजविण्यात ठेकेदाराकडून अक्षम्य दिरंगाई होत असल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. 

दरम्यान, पालकमंत्र्यांनी मागील आठवड्यात केलेल्या कणकवली दौऱ्यात सर्व्हिस रोड तसेच महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याची ग्वाही दिली होती. तसेच पार्किंग व्यवस्थेला शिस्त आणणे, रिक्षा व इतर वाहनांसाठी व्यवस्था करण्याचीही ग्वाही दिली होती; परंतु आठवडा उलटला तरीही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. शहरातील पटवर्धन चौक ते एस.एम.हायस्कूलपर्यंत सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. तेथे वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहन चालकांना खड्डेमय रस्त्यावरून वाहने हाकावी लागत आहेत. 

महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या क्षेत्रातील विक्रेते, व्यावसायिक यांचीही अतिक्रमणे हटवून हा मार्ग वाहन चालकांसाठी मोकळा करण्याचीही ग्वाही पालकमंत्री कणकवली दौऱ्यात दिली होती; परंतु त्याबाबतची कार्यवाही महामार्ग विभागाकडून झालेली नाही. महामार्गावरील तेलीआळी डीपी रोड येथे सर्वाधिक अतिक्रमणे असून तेथे वाहतूक कोंडीचीही समस्या सातत्याने निर्माण होत आहे. मात्र या समस्येवर अजूनही तोडगा काढलेला नाही. 

पार्किंगचे नियोजन आवश्‍यक 
शहरात तीन आसनी, सहा आसनी तसेच खासगी वाहन चालकांची संख्या मोठी आहे. हे व्यावसायिक सध्या जेथे जागा उपलब्ध होईल तेथे वाहने उभी करतात. भाजीपाला व्यावसायिकांनीही महामार्गावर दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर बाजार खरेदीसाठी दुचाकी, चारचाकीतून येणारे ग्राहक महामार्गावरच वाहने उभी करत असल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. चतुर्थी सणाच्या कालावधीत महामार्गावरील वर्दळ आणखी वाढणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबतचे नियोजन आत्तापासूनच करणे आवश्‍यक आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com