मृदा संधारणासाठी प्लास्टिक कापडाच्या गादीचा बंधारा

मृदा संधारणासाठी प्लास्टिक कापडाच्या गादीचा बंधारा

पाली - वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी वाहून जाते. त्यामुळे मृदेचा ऱ्हास होतो. हे मोठे नुकसान टाळण्यासाठी, मृदा संधारण व बंधारा लवकर, कमी पैशाचा व सोप्या रितीने बांधण्यासाठी मातीच्या ऐवजी प्लास्टिक कापडाचा (गादी) वापर करण्याचे तंत्र जलतज्ञ डॉ. अजित गोखले यांनी विकसित केले आहे. नुकतेच सिद्धेश्वर येथे प्रायोगिक तत्वावर अशा स्वरुपाचा बंधारा बांधण्यात आला होता. जिल्ह्यातील हा बहुधा पहिला प्रयोग आहे. कदाचित महाराष्ट्रातील देखील हा पहिला प्रयोग असण्याची शक्यता आहे.

सिद्धेश्वर गावचे सरपंच उमेश यादव यांना जलतज्ञ डॉ. गोखले यांनी गावात अशा स्वरुपाचा पहिला प्रयोग करण्यास सांगितले. त्यानुसार गोखले यांनी तयार केलेले प्लास्टिकची मोठ्या पिशवी किंवा गादीसारखे कापड देण्यात आले. काही दिवसांपुर्वी सिद्धेश्वर गावात शेठ ज. नौ. पालीवाला महाविदयालयातील राष्ट्रिय सेवा योजनेच्या विदयार्थ्यांचे शिबिर भरले होते. या विदयार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मिळून प्लास्टिक कापडाच्या पिशवीद्वारे (गादी) बंधारा बांधून हा प्रयोग यशस्वी करुन दाखविला. तसेच सिद्धेश्वर ग्रामस्थांनी देखील यासाठी सहकार्य केले. मात्र काही दिवसांनी कापडाला छिद्र पडले. पण बंधारा सुस्थितीत होता. परंतु, काही लोकांनी बंधा-याचे हे प्लास्टिक कापड नंतर लंपास केले. तरीसुद्ध हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यात काही सुधारणा करुन पुन्हा या पद्धतीने इतरत्र मृदा संवर्धनाचे बंधारे बांधले जाऊ शकतात असे जलतज्ञ डॉ. अजित गोखले यांनी सकाळला सांगितले.

कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला तशीही माती कमी असते. बंधारा बांधण्यासाठी ती माती गोणींमध्ये भरली जाते. मात्र दरवर्षी हि माती वाहून जाते व मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वनराई बंधारे बांधताना मातीच्या ऐवजी काय वापरता येईल आणि बंधारा सोपा कसा होईल त्याचा विचार करत होतो. त्यावेळी असे लक्षात आले की आपण जाड प्लास्टिकची एक मोठी गादी तयार केली आणि पाण्याने भरली तर ती सुद्धा हे काम करू शकेल. म्हणून प्रयोगादाखल एक प्लास्टिकची एक हवाबंद गादी तयार करून घेतली. त्या गादीत पाणी भरण्यासाठी पाईप ठेवले. ती वापरून सिद्धेश्वर येथे तो बंधारा प्रायोगिक तत्वावर घालण्यात आला. यात कष्ट कमी आहेत आणि माती वाहून जाण्याचा धोका नाही.
डॉ. अजित गोखले, जलतज्ञ, डोंबिवली

काम कसे करते?
ज्या ओढ्यामध्ये बंधारा बांधायचा असेल तेथे तळाचा भाग साधारण सपाट करतात. ओढ्यातील गाळ वा रेवसा हलवून जलाभेद्य स्तरापर्यंत जावे. उघडा कातळ असेल तर त्याची गरज पडत नाही. साधारण समतल करून घेणे. थोडी असमतोल जागा असेल तरीसुद्धा बंधाऱ्याच्या वरील भाग सम ठेवणे. त्यानंतर ही प्लास्टिकची गादी तेथे बसवून घेणे. गादी पुर्णपणे पाण्याने भरून घेणे. यामुळे गादीचे वजन वाढते आणि एक छोटा बंधारा पटकन तयार होतो. गरज पडल्यास थोड्या धोंडी किंवा गोणी वापरून बांधाला आधार द्यावा.

उपयोग व महत्व
श्रम व माती वाचते. मृदा संधारण होते. कमी वेळात बंधारा पूर्ण करणे. बांधार्यातील पाणी आटले तरी बांधामध्ये पाणी असेल तेही बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वापरता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com