रत्नागिरी विमानतळावरून होणार खासगी वाहतूक

रत्नागिरी विमानतळावरून होणार खासगी वाहतूक

रत्नागिरी : "तटरक्षक दलाच्या ताब्यातील रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणाची सुमारे 200 कोटींची कामे सुरू आहेत. धावपट्टी वाढविण्यासह, विमान पार्किंग, प्रवेशद्वार बदलणे, रस्ते आदी कामे केली जात आहेत. त्यामध्ये शीळच्या जलवाहिनी स्थलांतराचाही विषय आहे. तटरक्षक दलाच्या कार्यपद्धतीला कोणतीही बाधा न येता रत्नागिरी-मुंबई अशी खासगी हवाई वाहतूक सुरू करण्यावर भर आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेशी चर्चा करू‘‘, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
 

तटरक्षक दलाच्या विस्तारीकरणाच्या कामाची खासदार राऊत यांनी आज पाहणी केली. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
 

ते म्हणाले, "विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाची मी पाहणी केली. सुमारे 200 कोटींची ही कामे आहेत. संरक्षण यंत्रणेशी हा विषय निगडित असल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा करता येणार नाही. विमानतळाची धावपट्टी वाढवणे, विमान पार्किंग, प्रवेशद्वार बदलणे आदी कामांचा समावेश आहे. शीळच्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्यासाठी 2 कोटी 17 लाख, तर रस्त्यांच्या कामासाठी 4 कोटींचा निधी मंजूर आहे; परंतु जागेसाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे.‘‘ 


रत्नागिरी तटरक्षक दल हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे संरक्षण यंत्रणेला कोणतीही बाधा न येता याच विमानतळावरून खासगी वाहतूक सुरू करण्यावर भर आहे. तटरक्षक दल आणि खासगी वाहतूक असे दोन भाग करून ही वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे श्री. राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com