राजापूर : नदीतील भराव; पूरपरिस्थितीला वाव

तत्काळ गाळ उपसण्यासाठी ग्रामस्थांचा जनआंदोलन छेडण्याचा इशारा
अर्जुना नदी
अर्जुना नदीsakal

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम करताना नदीपात्राच्या मध्यभागामध्ये टाकण्यात आलेला भराव काढण्यात आला आहे. मात्र, कोंढेतडच्या बाजूचा भराव जैसे थे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नदीपात्रही अरुंद झाले आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये हा मातीचा भराव नदीच्या पाण्यासोबत वाहून जाऊन त्याचा कोंढेतड पूल ते बंदरधक्का परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संचय झालेला आहे. यावर्षीही पावसाळ्यामध्ये तशीच स्थिती होण्याची शक्यता आहे. या मातीच्या भरावामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शीळ-गोठणे दोनिवडे रस्त्याला धोका संभवत असून शहरालाही पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे.

महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या येथे अर्जुना नदीपात्राच्या कोंढेतडच्या बाजूने टाकण्यात आलेला मातीचा भराव वा तेथील गाळ तत्काळ काढून टाकण्यात यावा. अन्यथा, त्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे पदाधिकारी आणि कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्यासह शहरातील व्यापाऱ्‍यांनी दिला आहे. त्याबाबतचे स्वाक्षऱ्‍यांचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे. त्यामध्ये दिनानाथ कोळवणकर, सुधीर खडपे, प्रकाश कातकर, दिलीप रहाटे, गिरीष विचारे, विनय गादीकर, संदेश आंबेकर यांच्यासह अन्य व्यापाऱ्‍यांच्या स्वाक्षऱ्‍या आहेत.

महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर सर्वाधिक उंचीचा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामाच्यावेळी ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या मध्यभागी आणि कोंढतडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकलेला आहे. पावसाळ्यामध्ये हा भराव जैसे थे राहिल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका गतवर्षी शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला बसला होता. त्यानंतर, वारंवार केलेल्या तक्रारीनंतर नदीपात्राच्या मध्यभागी टाकण्यात आलेला मातीचा भराव काढला. कोंढेतडच्या बाजूचा भराव तसाच ठेवला आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे

यावर्षीही या भरावाचा फटका रस्त्याला बसण्याची शक्यता आहे. मोठा पूल परिसरासह कोंढेतड पूल ते बंदरधक्का परिसरातील कोंढेतडच्या बाजूला साचलेल्या गाळाचा तत्काळ उपसा व्हावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वेळेमध्ये गाळ उपसा न होता, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवल्यास पूल बांधकामाची ठेकेदार कंपनीची जबाबदार राहील, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

राजापूरकरांची डोकेदुखी

कोदवली आणि अर्जुना नदीपात्रामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ गेल्या अनेक वर्षापासून राजापूरकरांची डोकेदुखी ठरलेला आहे. त्यामध्ये आता कोंढेतड पूल ते बंदरधक्का या दरम्यान, नदीच्या कोंढेतड बाजूला मोठ्या प्रमाणात साठलेल्या गाळाची भर पडली आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही नदीच्या पाण्याचा प्रवाह राहिल्यास पुंडलिक मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच, नदीच्या पाण्याचा प्रवाह मंदिराच्या दिशेने वा बाजूने राहिल्यास पूरस्थितीमध्ये बंदरधक्का परिसर आधीच्या तुलनेमध्ये लवकर पुराच्या पाण्याखाली जाईल.

एक नजर..

  • अर्जुना नदीवर सर्वाधिक उंचीचा पूल बांधला

  • पूल बांधकामावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव

  • गतवर्षी पावसाळ्यामध्ये हा भराव ‘जैसे थे’ राहिला

  • शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला बसला फटका

  • कोंढेतडच्या बाजूचा भराव तसाच ठेवला

  • यावर्षीही या भरावाचा फटका रस्त्याला बसणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com