कोयनेचे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव - रामदास कदम

कोयनेचे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव - रामदास कदम

दाभोळ - कोयनेचे समुद्रात वाहून जाणाऱ्या अवजलाचा वापर कोकणाची भुमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता करण्यात येणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

दापोली दौऱ्यात काल (ता.14) पत्रकारांशी बोलताना कदम पुढे म्हणाले की, गेल्या चार वर्षापासून कोयनेच्या समुद्राकडे वाहुन जाणाऱ्या पाण्याचा उपयोग कोकणाचे नंदनवन होण्यासाठी करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करत होतो. मध्यंतरीच्या काळात कोयनेचे हे पाणी लिफ्ट करून मुंबईकडे नेण्याचा घाटही घालण्यात आला होता. मात्र आपण त्याला तीव्र विरोध केला होता. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपण हा विषय पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. सध्या राज्यावर मोठया प्रमाणात कर्ज असल्याने या योजनेच्या खर्चासाठी खास बाब म्हणून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी मागणी करण्यात यावी व या प्रस्तावाचा फॉलोअप सचिवांनी करावा असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती कदम यांनी दिली.

हे पाणी उचलल्यास कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. कोकणच्या विकासासाठी केंद्राकडे पाठविण्यात येणारा हा पाहिलाच प्रस्ताव आहे 

- रामदास कदम  

सीआरझेडबद्‌दल बोलताना ते म्हणाले की, पूर्वी किनारपट्‌टीच्या भरतीरेषेपासून 500 मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास सीआरझेड कायद्‌यामुळे परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे कोकणाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभूनही त्याचा उपयोग पर्यटनासाठी करता येत नव्हता व त्यामुळे कोकणचा विकास थांबला होता. 

आपण पर्यावरणविभागाचा कार्यभार स्वीकारल्यावर सीआरझेड कायद्‌यात शिथिलता आणण्यासाठी चार वर्षे केंद्र सरकारकडे जाऊन प्रयत्न केले. तेथील मंत्रालयात जाऊन ठाण मांडून बसलो त्यामुळे या कायद्‌यात शिथिलता आणण्यात आली. आता ही मर्यादा 50 मीटर अंतरापर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळे कोकणात आता पर्यटनवाढीसाठी विविध विकासकामे हाती घेता येणार असून आता कोकणचा विकास होण्यास निश्‍चित मदत होणार आहे. यामुळे कोकणातील तरुणांच्या हाताला गावातच काम मिळेल व मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबविण्यास मदत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com