Ratnagiri Dam Mishap : शासकीय अधिकारी, कार्यकर्त्यांचा पवारांकडून 'तास' 

Ratnagiri Dam Mishap : शासकीय अधिकारी, कार्यकर्त्यांचा पवारांकडून 'तास' 

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिवरे धरण दुर्घटनेतील आपादग्रस्तांची भेट घेतली. झालेल्या नुकसानीची माहिती शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. आपत्तीवर कशा प्रकारे मात करता येईल, याबाबत पक्षाचे पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांचा पवारांनी तासच घेतला. पक्षीयस्तरावर काय केले पाहिजे, अधिकाऱ्यांनी कोणत्या योजनांची अंमलबजावणी करायला हवी, याबाबत पवार यांनी सविस्तर माहिती दिली.

तिवरे गावात दाखल झाल्यानंतर पवारांनी प्रथम फुटलेल्या धरणाची पाहणी केली. नंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात आपादग्रस्तांशी संवाद साधला. गावात किती कुटुंब आहेत, नोकरीनिमित्त गावाबाहेर किती आहेत, घटना घडली तेव्हा गावात कोण कोण होते, ग्रामस्थांच्या उपजिविकेचे साधन काय, शिक्षणाच्या कोणत्या सोयी येथे उपलब्ध आहेत, गावात एसटी येते का, पाण्याची सोय कशी आहे, दुर्घटनेत नेमके किती नुकसान झाले, घरे किती वाहून गेली, माणसी किती दगावली, पशुधन आणि शेतीचे किती नुकसान झाले, या सर्व नुकसानीचे पंचनामे झाले का ? शासनाकडून किती मदत मिळाली, ती कोणत्या प्रकारे होती, अशी संपूर्ण माहिती पवार यांनी घेतली. 

ग्रामदेवतेच्या मंदिरात पवार प्रश्‍न विचार होते. आमदार भास्कर जाधव, तहसीलदार जीवन देसाई, स्थानिक ग्रामस्थ तानाजी चव्हाण, अजित चव्हाण हे त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत होते. अर्धा तास प्रश्‍नोत्तराचा तास होता. महसूल विभागाने तयार केलेल्या टिपणीवर पवारांनी नजर फिरवली. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी यापुढे काय केले पाहिजे, याबाबत पवारांनी मार्गदर्शन केले.

प्रामुख्याने उद्धवस्त शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्यांची प्रभावी अंमलबजावणी गावात झाली पाहिजे, अशी सूचना पवारांनी केली.आपत्तीतून वाचलेल्या मुलांना शिक्षण घ्यायचे असेल तर अशांसाठी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाईल असा शब्द पवारांनी दिला. आपादग्रस्तांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा शासकीय अधिकारी दाद देत नसतील तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा,अशी सूचना केली. आपदग्रस्तांना मदत करणे आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांना मदत करा अशी सूचना पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केली. 

पुलांकडे वेळीच लक्ष द्या 
तिवरे धरणावर अनेक गावांची पाणी योजना अवलंबून होती. परिसरातील विहिरींना बारमाही पाणी होते. दुर्घटनेनंतर विहिरी आटल्या आहेत. पाणी योजनाही मोडकळीस आल्या आहेत. या परिसरातील अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत. त्यांची उंची कमी आहे. या पुलांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर आणखी मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते याकडे अॅड. अमित कदम यांनी पवारांचे लक्ष वेधले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com