रत्नागिरी : गावातच रोजगार; लखपतीही बनता येणार!

१० गावांचा २१० कोटींचा आराखडा, ४ हजार कुटुंबांना फायदा
 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीsakal

रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामे एकाच गावात राबवून तेथील ग्रामस्थांना रोजगारातून ‘लखपती’ बनविण्याच्या योजनेसाठी जिल्ह्यातील दहा गावांची निवड केली आहे. या अंतर्गत मनरेगाच्या अधिकाऱ्‍यांनी घरोघरी सर्वे करून बनवलेल्या २१० कोटी ४१ लाखांच्या आराखड्यात दहा हजारांहून अधिक कामांचा समावेश आहे. या कामांमधून पुढील दहा वर्षांत ३३ लाख ९४ हजार मनुष्यदिन निर्मिती होणार असून ४ हजार कुटंुबांना गावातल्या गावात रोजगार मिळणार आहे.

रोजगार हमी योजना तळागाळात पोचवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात या योजनेची अंमलबजावणी करून लोकांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. सार्वजनिकसह वैयक्तिक कामेही यामधून घेणे शक्य आहे. विकासकामांबरोबरच गावातल्या गावात लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देतानाच आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो.

यासाठी मागील महिन्यात मनरेगातर्फे दहा गावे निवडली गेली. प्रत्येक तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. त्या गावातील प्रत्येक घरात जाऊन मनरेगामधून कोणती कामे घेता येऊ शकतात, याचा आराखडा बनविला आहे. २१० कोटी ३३ लाख रुपयांची कामे यामधून घेता येतील. यामध्ये वैयक्तिक स्वरुपाची ९ हजार ७२१ तर सार्वजनिक सुमारे ७०० कामांचा समावेश आहे. यामध्ये कुशल आणि अकुशल कामांसाठी निधी दिला जातो. याची अंमलबजावीण पुढील दहा वर्षे केली जाणार असून दरवर्षी या कुटुंबांकडून कामाचे प्रस्ताव घेतले जाणार आहेत. यामधून प्रतिदिन २५६ रुपये रोज दिला जातो. दहा गावांमध्ये सर्वाधिक १ हजार ७९६ कामे शोषखड्डे, नाडेपची १ हजार २१७ तर फळबाग लागवडीची १ हजार ०८८ कामे आहेत. ही कामे करताना त्या-त्या गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

प्रशासनाची भूमिका महत्त्वाची...

सध्या मनरेगांतर्गत मनुष्यबळ कमी असल्याने प्रस्ताव मंजुरीसह जीओ टॅगिंगची कामे करताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे प्रत्यक्ष कामे चालू करेपर्यंत लाभार्थ्याच्या नाकीदम येते. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ही कामे करता येतील

मनरेगातू सिंचन विहिर, शोषखड्डे, नाडेप, घरकुल, शेततळे, शौचालये, फळबाग लागवड, गांडुळ खत,

गुरांचा गोठा, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड, ढाळीचे बांध, विहिर पुनर्भरण, आझोला, मोहगणी, शेत सपाटीकरण, वैयक्तिक रोपवाटीका, बांध बंदिस्ती, दगडी बांध, माती बांध, तुती लागवड, पडक जमिन वृक्षलागवड, रस्ते, बांबू लागवड, किचनशेड, स्मशानभुमि दुरुस्ती, अस्तीकरण शेततळे, सीसीटी, मत्स्यशेती यासह सार्वजनिक कामांचाही समावेश आहे.

एक नजर..

वैयक्तिक स्वरुपाची कामे ९ हजार ७२१

सार्वजनिक कामे ७००

दहा गावांमधील कामे

शोषखड्ड्यांची सर्वाधिक कामे १ हजार ७९६

नाडेपची १ हजार २१७

फळबाग लागवडीची १ हजार ०८८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com