बिबट्यांभोवतीचा फास होतोय ढिला

बिबट्यांभोवतीचा फास होतोय ढिला

कायद्याच्या बडग्याचा परिणाम - दोन वर्षांत प्रमाण घटले

रत्नागिरी - रानटी डुकरे वा जनावरांसाठी लावलेली फासकी बिबट्यासाठी मृत्यूचा फास ठरते. दोन वर्षांपूर्वी याचे प्रमाण अधिक होते; मात्र वन विभागाने फासकीबाबत कडक कायदे केले. फासकी लावणारे, जागा मालक, फासकीची वायर पुरविणाऱ्यांना आरोपी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फासकी लावण्याला आळा बसला. गेल्या वर्षी रत्नागिरी विभागातील चार तालुक्‍यांत चार बिबटे फासकीत अडकले. वन विभागाने त्यांना कौशल्याने जीवदान दिले. यावर्षी एकही बिबट्या फासकीत अडकला नाही. त्यामुळे हा फास ढिला होतो आहे.

फासकी लावल्याची दोन वर्षांपूर्वीची आठ प्रकरणे न्यायालयात आहेत. अशा कारवाईची मोठी धास्ती लोकांनी घेतली आणि फासकीबाबत कायद्याचा फास आवळण्यापेक्षा ती टाळणे बरे, असे वाटू लागले. जंगलांची शान मानले जाणारे वाघ, सिंह माणसामुळे दुर्मिळ झाले. त्यात बिबट्या तगून राहिला खरा, पण मानवाशी त्याचा संघर्ष सुरू आहे. अतिशय चपळ मानल्या जाणाऱ्या बिबट्याला शिकार किंवा भक्ष्यासाठी जंगलात प्रचंड मेहनत आणि स्पर्धा करावी लागते. त्यामानाने मानवी वस्तीत शेळ्या-मेंढ्या, कुत्री, जनावरे हे पाळीव प्राणी सहज मिळतात. त्यामुळे बिबट्यांचा कल मानवी वस्तीकडे वाढल्याचे अनुमान वन विभागाने काढले. शिवाय जंगले कमी होवून वाढलेल्या लोकवस्तीचा परिणाम वन्यजीवांवर होत आहे. त्यामुळे बिबट्याच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. 

२०१६ मध्ये ३ बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. रेल्वेच्या धडकेने १ ठार झाला. विहिरीत पडलेले २ आणि फासकीत अडकलेल्या ४ बिबट्यांना वन विभागाने जीवदान दिले. यासह १ जखमी, विहिरीत पडलेला १ व घरात शिरलेला १ अशा तिघांचीही सुटका झाली. वर्षात सहा महिन्यांमध्ये ४ मृत बिबटे आढळले. 

फासकीबाबत वन विभागाने कडक कायदे केले आहेत. फासकी लावणारा, जागामालक, वायर देणारा दुकानदार यांना आरोपी केले जाते. कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, या भीतीने फासकी लावण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांमध्ये चांगलेच घटले आहे.
- बी. आर. पाटील, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी

खेपा आणि शिक्षा नको...
रानटी डुकरांमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी फासकी लावली जाते; मात्र त्यामध्ये बिबट्या अडकून त्याचा मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या. याला पायबंद घालण्यासाठी फासकी लावणारे, जागामालक आणि फासकीसाठी वायर पुरविणाऱ्यांना आरोपी करण्यास सुरवात झाली. रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्‍वर तुालक्‍यात दोन-तीन वर्षांपूर्वी अनेक प्रकार उघड झाले. न्यायालयाच्या खेपा आणि शिक्षेच्या धास्तीने फासकी कमी होऊ लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com