किनाऱ्यावरील कांदळवन संरक्षणासाठी ठोस पावले

किनाऱ्यावरील कांदळवन संरक्षणासाठी ठोस पावले

रत्नागिरी, सिंधुदुर्गचा स्वतंत्र कक्ष - मुंबईशी जोडण्याचा प्रयत्न; कर्मचारी नियुक्तीचा निर्णय  
रत्नागिरी - किनाऱ्यावरील पर्यावरण संरक्षणात कांदळवन महत्त्वाची भूमिका बजावतात. कोकणातील कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा स्वंतत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. वन विभागाकडील हा कक्ष मुंबईच्या कांदळवन कक्षाशी जोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. येत्या वर्षभरात त्यावर कार्यवाही होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक कर्मचारी नियुक्‍तीचाही निर्णय झाला आहे. याला दापोलीच्या कांदवळन कक्षातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

रत्नागिरी जिल्ह्याला १६० किलोमीटरचा किनारा लाभला आहे. त्यात सुमारे १४०० हेक्‍टरहून अधिक खारफुटीची जंगले आहेत. ही जंगले बहुतांशी खाडीकिनारीच आहेत. कोकणात विविध उद्योग किनारी भागात येत असल्यामुळे या जंगलांना धोका निर्माण झाला आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असल्याने या जंगलांचे अस्तित्व धोक्‍यात येऊ शकते. मत्स्य महाविद्यालयासह पर्यावरण संस्थांच्या माध्यमातून खारफुटीची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या चार वर्षांमध्ये लागवडीला शासनाकडूनही पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. खारफुटी हा वन विभागाशी जोडला गेलेला होता. किनारी भागातील कायदे कठोर असल्यामुळे लागवड किंवा बांधकाम करण्यासंदर्भात अनेक अडथळे आणि परवानग्यांची गरज असते. खारफुटी भागांचे संवर्धन करण्यात वन विभागाला मर्यादा पडत होत्या. त्यातूनच राज्य शासनाने हा विभाग मुंबईच्या कांदळवन विभागाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांदळवनाचे संवर्धन करणे शक्‍य होणार आहे. 

या भागाचा उपयोग खेकडा संवर्धनासाठी होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी कांदळवने संरक्षित आहेत. खाडीशेजारील काही जागांवर लागवड करण्याची गरज आहे; मात्र निधी नसल्याने ते शक्‍य होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खारफुटी तोडीच्या तक्रारी
मुंबईसह कोकणातील खारफुटीची जंगले तोडीच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन वर्षभरात कोकण आयुक्‍तांनी यावर लक्ष केंद्रित केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तक्रारींसह पाच जिल्ह्यांतील सुमारे सव्वापाचशे खारफुटी तोडीच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तत्काळ निकाली काढण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com