लांजा, राजापुरात दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड

लांजा, राजापुरात दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड

रत्नागिरी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (नरेगा) राजापूर, लांजा तालुक्‍यांत दोनशे हेक्‍टरवर बांबू लागवड केली जाणार आहे. समूह शेतीतून (क्‍लस्टर फार्मिंग) बांबू लागवडीचा कोकणातील हा पहिला प्रयोग असल्याचे उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांनी सांगितले.

रोजगार हमी योजना कार्यालयामार्फत रत्नागिरीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक वनीकरणचे उपसंचालक श्री. धुमाळे यांनी मार्गदर्शन केले. लागवड, रोपांची निवड, मार्केटिंग, काळजी कशी घ्यावयाची याची माहिती यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात आली.

नरेगा योजनेतून आंबा, काजूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. त्याच धर्तीवर बांबू लागवड करण्याचा निर्णय रोजगार हमी विभागाकडून घेण्यात आला. त्यासाठी लांजा, राजापूर येथील शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली होती. मुंबईमध्ये बांबूला मोठी मागणी असते. तसेच फर्निचर, अगरबत्ती व्यवसाय आणि कन्स्ट्रक्‍शनसाठी बांबूचा वापर अधिक केला जातो. त्याला पूरक अशा जातींच्या बांबूची लागवड केली तर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकतो.

कोकणात व्यावसायिक स्तरावर याकडे पाहिले जात नाही. क्वचित ठिकाणी शेतावर किंवा वहाळाच्या शेजारी बांबूची बेटं पाहायला मिळतात. कोकणातील जमिनीत चांगल्या प्रकारचा बांबू होऊ शकतो. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी रोपं बेंगलोर येथून आणण्यात येणार आहेत. बाल्कोबा, न्यूटल्स, ट्रिप्टस्‌ या जाती प्रसिद्ध आहेत. एका हेक्‍टरला चारशे बांबूची रोपे लावली जातात.

उत्पादकता वाढविण्यासाठी रोपांना ठिबक सिंचन (ड्रीप) योजनेचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि लीड बॅंकेकडून यासाठी शंभर टक्‍के कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. लागवडीबरोबरच त्यातून निर्माण होणाऱ्या अन्य व्यावसायांचेही मार्गदर्शन तेथील तरुणांना देण्यात येणार आहे. बांबूपासून तयार केलेल्या फर्निचरला शहरांमध्ये मागणी आहे. ती कशी तयार करायची याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बांबू मिशनची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी रोहयोकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

निधी वाढविण्यासाठी प्रयत्न

रोपे खरेदी, खड्डे खोदणे, खते देणे यासाठी नरेगा योजनेतून बांबूसाठी हेक्‍टरी सत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत. आंबा, काजूप्रमाणे बांबूला एक लाख 20 हजार रुपये हेक्‍टरी मिळवून देण्यासाठी रोहयोकडून प्रयत्न सुरू आहेत. वाढीव निधी मिळाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी याकडे वळतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com