मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेनेचे मंत्री झोपा काढतात का? - सुनील तटकरे 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेनेचे मंत्री झोपा काढतात का? - सुनील तटकरे 

चिपळूण - जिल्ह्याचा विकास निधी कमी होतोय, केंद्र सरकारचे प्रकल्प रखडले आहेत. मग सरकारमध्ये सहभागी असलेले या जिल्ह्यातील नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीत झोपा काढतात का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारला. 

शिवसेना-भाजपमध्ये सत्तेचा तमाशा सुरू असल्यामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. सेनेची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोपही तटकरे यांनी केला. 2014 ची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दृष्टीने सर्वाधिक कठीण निवडणूक होती. राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दोन वर्ष सरकारचा राज्यावर प्रभाव होता. सत्ताधारी पक्षाला आम्ही काम करण्याची संधी दिली; परंतु जीएसटी, नोटाबंदी, महिलांवरील अत्याचार, कायदा व सुव्यस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी प्रश्‍नांवर मागील सहा महिने सरकारच्या विरोधी वातावरण तयार झाले आहे.

भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर राज्यभर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री एक आकडेवारी सादर करतात आणि सहकारी मंत्री दुसरी आकडेवारी देतात. भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये सुद्धा समन्वय नाही हेच दिसते. 
शिवसेना हा भाजपबरोबर फरफटत जाणारा पक्ष बनला आहे. या पक्षाचे नेतृत्वही संभ्रमात आहे. एका बाजूला सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला विरोध दर्शवायचा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका सामान्य लोकांच्या लक्षात आली आहे.

पालकमंत्री असताना जिल्हा नियोजनचा निधी 60 कोटीने वाढविला होता. शिवसेनेच्या विद्यमान पालकमंत्र्यांनी तो वाढविण्याऐवजी कमी केला. शिवसेनेचे नेते मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, तेव्हा जिल्ह्याच्या प्रश्‍नावर का बोलत नाहीत. आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आंदोलन करून जनजागृती करणे हेच आमच्या हाती आहे. नागपूर अधिवेशनात आम्ही कोकणच्या प्रश्‍नांवर आवाज उठविणार आहोत. सरकारकडून सकारात्मक उत्तर न आल्यास हे अधिवेशन आम्ही चालू देणार नाही, असा इशारा श्री. तटकरे यांनी दिला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते आदी उपस्थित होते. 

गीतेंकडून अधिकाराचा वापर नाही 
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. आघाडीचे सरकार असताना महामार्गावर टोल बसू नये यासाठी मी प्रयत्न केले होते. मात्र, केंद्रीय मंत्री अनंत गीते महामार्गावर टोल बसणार असल्याचे सांगतात. गीते सहा वेळा या जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. केंद्रातील मंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांएवढे अधिकार असतात, मग अनंत गीते आपल्या अधिकाराचा का वापर करत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com