अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळी भेट - उदय सामंत

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळी भेट - उदय सामंत

रत्नागिरी - पाच टक्के मानधन वाढ झाली तरी अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न कायम आहेत. जिल्हा पातळीवरील त्यांचे प्रश्‍न  जिल्हा परिषदेने सोडवले. आमदार सामंत यांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यासाठी वैद्यकीय माहिती नसताना त्यांना डोस पाजावे लागतात. म्हणून तेथे परिचारीका उपस्थित ठेवणार, प्राथमिक उपचार पेटी त्यांना देणार, शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपचार, प्रवास भत्ता तत्काळ असे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे त्यांच्या ७० टक्के मागण्या पूर्ण केल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. 

आमदार सामंत म्हणाले, की आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका, मतदनीसांनी आंदोलन केले. ते चिघळण्याची शक्‍यता होती. सरकारला पाझर फुटला नाही; मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशी समक्ष जाऊन शिवसेना सदैव पाठीशी खंबीर उभी आहे, असे आश्‍वासन दिले.

त्यानंतर त्यांना ५ टक्के मानधनवाढ मिळाली. जिल्हास्तरावरील त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बैठक घेतली. त्यांच्या अडचणींवर तत्काळ तोडगा काढला. अंगणवाडी सेविका, जेमतेम ९ ते १० शिकलेल्या असतात. त्यांना वैद्यकीय ज्ञान नसले तरी डोस पाजावे लागतात. चुकीच्या पद्धतीने डोस गेल्यास काहीही होऊ शकते. ते टाळण्यासाठी त्यांच्याबरोबर परिचारिका देण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. 

गेली दोन वर्षे प्रथमोपचार पेटी (किट) त्यांना उपलब्ध झाली नाही. ती तत्काळ देण्यात येणार आहे. त्या शासकीय मानधन घेतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर मोफत उपचाराचे आदेश दिले आहेत. बंद पडलेली लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू करणार आहेत. त्यांना वर्षाचे ३०० दिवस काम करावे लागते.

तेव्हा सकाळी ८ ते ११ या वेळेत अंगणवाडी सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऑनलाईनमुळे त्यांना मानधन व खर्च वेळेवर मिळत नाही. भविष्यात या अडचणी येऊ नयेत, म्हणून खातेप्रमुखांना सूचित केले आहे. यांची अंमलबजावणी होते की नाही याचा आढावा घेण्यासाठी २ महिन्यांने पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. 

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्नेहल सावंत, तालुकप्रमुख बंड्या साळवी, जिल्हा सदस्य उदय बाने, बाबू म्हाप, संबंधित खात्याचे खातेप्रमुख तहसीलदार मछिंद्र सुकटे तसेच मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीसही 
उपस्थित होत्या.

...तर रेशन दुकानदारांवर कारवाई
केंद्र शासनाने तांदूळ, गहू २, ३ रुपयांमध्ये देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात रास्त धान्य दुकानातून ते ६ आणि ७ रुपयाला विकले जाते. अंगणवाडी सेविका हे धान्य उचलून त्याचे बिल देतात. शासनाच्या आदेशाप्रमाणे २, ३ रुपयाने बिल काढले जाते. वरच्या रकमेचा बोजा त्यांच्यावर पडतो. पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदार यांच्यात समन्वय नसल्याने हा गंभीर प्रकार सुरू आहे. जास्त दराने धान्य विकणाऱ्या दुकानदारावर कारवाईचे आदेश दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com