सहनशीलतेचा अंत पाहू नका

सावंतवाडी - येथील उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना जाब विचारताना नगराध्यक्ष बबन साळगावकर. या वेळी उपस्थित अन्नपूर्णा कोरगावकर, अनारोजिन लोबो आदी.
सावंतवाडी - येथील उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना जाब विचारताना नगराध्यक्ष बबन साळगावकर. या वेळी उपस्थित अन्नपूर्णा कोरगावकर, अनारोजिन लोबो आदी.

महावितरणला इशारा - समस्या गंभीर, अधिकारीही हतबल

सावंतवाडी - शहरात दिवसेंदिवस वीज समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे शहरवासीयांचा अंत पाहू नका, येत्या आठ दिवसांत विजेच्या समस्या सोडवा. अन्यथा त्यानंतर झालेल्या स्थितीला तुम्ही जबाबदार रहाल, असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान मनुष्यबळ आणि साधनसामग्री कमी असल्यामुळेच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे; मात्र त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही, अशी हतबलता उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी व्यक्त केली.

शहरात गेले अनेक दिवस विजेच्या समस्या जाणवत आहेत. काल मंगळवारी (ता. २७) कारने खांबाला धडक दिल्यामुळे विजेच्या तारा रस्त्यात कोसळल्याचा प्रकार घडला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी तो परिसर रात्रभर काळोखात राहीला. त्यात कुटीर रुग्णालयाचा समावेश होता. याबाबतचा जाब विचारण्यासाठी नगराध्यक्ष साळगावकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी श्री. विज कंपनीचे अधिकारी श्री. राजे यांना आगाऊ कल्पना देवून त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले; परंतु तत्पुर्वी सांगेली येथील बिघाड काढण्यासाठी श्री. राजे हे निघून गेले. 

यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या श्री. साळगावकर यांच्यासमवेत असलेल्या उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, आनारोजीन लोबो, व्यापारी संघाचे जगदिश मांजरेकर, संतोष मुंज, संजू शिरोडकर, बाळ बोर्डेकर, अभय पंडीत, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, शब्बीर मणियार आदींनी त्याच ठिकाणी ठाण मांडण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी असलेल्या कनिष्ठ अभियंता वैभव बारावकर यांना जाब विचारला; मात्र आपल्याला जास्त काहीच माहीती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जमाव अधिकच चिडला.

तब्बल दिड तासानंतर श्री. राजे कार्यालयात आले. यावेळी कल्पना देवून सुध्दा पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजेंना धारेवर धरले. झालेल्या प्रकाराला वीज कंपनीचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप करत उपस्थित नागरीक आणि पदाधिकाऱ्यांनी श्री. राजे यांच्यावर प्रश्‍नाची सरबत्ती केली. यावेळी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ आणि साधनसामुग्री मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत; मात्र त्या दुर करण्यासाठी वरिष्ट स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, असे राजे यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात शहरातील विजेच्या समस्या न सोडविल्यास आपण आंदोलन करू आणि झालेल्या प्रकाराला सर्वस्वी महावितरणचे अधिकारी जबाबदार असणार आहेत, असा इशारा श्री. साळगावकर यांनी दिला.

सिंधुदुर्गनगरीत आज बैठक 
वीज प्रश्‍नाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांना फोन करुन नगराध्यक्ष साळगावकर आणि अनारोजीन लोबो यांनी तक्रारीचा पाढा वाचला. यावेळी श्री. केसरकर यांनी आपण उद्या (ता.३०) सिंधुदुर्गनगरीत विज अधिकाऱ्यांची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेवू, असे आश्‍वासन दिल्याचे लोबो यांनी सांगितले.

पन्नास वर्षांत असा प्रकार घडला नाही 
या वेळी महावितरणच्या आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नगराध्यक्ष साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या पन्नास वर्षांत असा प्रकार घडलेला नाही. अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे दर पंधरा मिनिटांनी विजेची समस्या निर्माण होत आहे. जिल्ह्यातच ही समस्या आहे. याबाबत लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी काही बोलत नाहीत ही दुदैवी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com