सावंतवाडी - तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात शाळा समायोजित केल्या आहेत. ही संख्या ३७ इतकी होती; मात्र अन्य शाळांना ट्रान्सपोर्टची सुविधा देऊन त्या चालू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आज येथे आयोजित पंचायत समितीच्या मासिक बैठकीत शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मळेवाड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा सर्वच सदस्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला.
येथील पंचायत समितीची मासिक सभा आज येथे सभापती रवींद्र मडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीला दाणोली, सातुळी, बावळाट परिसरात राबविलेल्या नळपाणी योजनांना पाणी नाही. शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत आणि योजना सुध्दा बंद पडल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी तसेच संबंधित गावांना पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी त्यांना पाण्याचे स्त्रोत कसे निर्माण करून देता येतील यावर प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी सदस्य संदीप गावडे यांनी केली.
नेमळे गावात नळपाणी योजनेचे काम गेले तीन वर्षे सुरू आहे. त्या कामात सातत्य नाही. त्यामुळे लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठेकेदार ठेका घेऊन अन्य लोकांकडून काम करून घेतात. त्यामुळे हे प्रकार बंद करण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी सदस्य रूपेश राऊळ यांनी केली.
त्यानंतर झालेल्या चर्चेत बांदा आणि परिसरातील गावांत साथीचे आजार पसरले होते. तेथील काही विहिरींचे पाणी दूिषत होते. त्यामुळे आवश्यक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात याव्यात, अशी मागणी उपसभापती निकिता सावंत यांनी केली. आरोग्याचा प्रश्न हा तालुक्याला भेडसावणारा आहे.
त्यामुळे योग्य ती कार्यवाही व्हावी, अशा सुचना सभापती मडगावकर यांनी दिल्या.
तालुक्यातील सात शाळा समायोजित केल्या आहेत. त्यातील शिक्षण समायोजित करण्याचे अधिकार सभापतींना दिले आहेत. या यादीत असलेल्या अन्य ३७ शाळांच्या विद्यार्थ्यांना तुर्तास ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
गेल्यावर्षी झालेल्या चक्री वादळामुळे अनेक शेतकरी व बागायतदारांचे नुकसान झाले होते. या विषयावर चर्चा झाली; मात्र अशा प्रकारचे कोणतेही नुकसान भरपाई शासनस्तरावरुन प्राप्त झालेले नाही, अशी माहिती कृषी विभागाकडुन देण्यात आली. तर आंबा काजू पिकासाठी आवश्यक किटकनाशके पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध झाली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पंचायत अभियानासाठी कंबर कसा
सभापती मडगावकर म्हणाले, ‘‘गतवर्षी जिल्ह्यातील देवगड आणि कुडाळ या पंचायत समितींना यशवंतराज पंचायत अभियान यशस्वी होण्याची संधी मिळाली होती. यावर्षी ते पारितोषिक सावंतवाडीला मिळवायचे आहे. त्यादृष्टीने प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.