रत्नागिरी : गेली काही दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे सचिव विनायक राऊत विरुद्ध भाजपचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांच्यात राजकीय वादावादी आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातून हा विषय पक्षपातळीवर उचलून धरल्यामुळे सेना विरुद्ध भाजप असा वाद पेटला आहे. विनायक राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना नीलेश राणे यांनी राऊत दिसतील, तिथे त्यांना फटकवू, असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसैनिक संतापले आहेत. शिवसैनिकांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन नीलेश राणे यांच्यावर आगपाखड केली. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
शिवसेना-भाजपमधील वाद म्हणजे ऍक्शनला रिऍक्शन आहे. दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर झालेल्या चर्चांमुळे हा उद्रेक झाला. मात्र, दोन्ही जिल्हे आता शांत राहिले पाहिजेत. राजकीय वादाचा उद्रेक होता नये, या मताचा मी आहे. यातून मोठा वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता दोन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. मी माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना योग्य सूचना दिल्या आहेत. त्यांनीही आपल्या लोकांशी बोलावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दोन्ही जिल्हे शांत रहावेत..
यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. त्याचा उद्रेक झाला आणि वाद पेटला. मोठे वाद पेटणार नाहीत, याची दक्षता दोन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. दोन्ही जिल्हे शांत राहिले पाहिजेत. माझ्या लोकांशी मी बोललो आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्याशी बोलावे.
...तर राजन तेलींनी राजकीय निवृत्ती घ्यावी
सिंधुदुर्गमध्ये मी राजकीय दबाव टाकत आहे, असा आरोप भाजपचे राजन तेली करत आहे. माझे राजन तेलींना आव्हान आहे की, त्यांनी मी दबाव टाकल्याचा एक पुरावा द्यावा, मी राजकीय निवृत्ती घेतो. पण ते सिद्ध केले नाही, तर त्यानी राजकीय निवृत्ती घ्यावी.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.