आंदोलनानंतर सावंतवाडीत दिवाबत्ती कामासाठी कर्मचारी 

सावंतवाडी - येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला. 
सावंतवाडी - येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला. 

सावंतवाडी - वीज अधिकाऱ्यांनी शहरातील दिवाबत्तीचे काम करणारे काढून घेतलेले कर्मचारी अखेर आज पुन्हा दिले आहेत. यासाठी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घेराव घालून दणका दिल्यानंतर तात्काळ याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही अधिकाऱ्यांकडुन नागरीकांना त्रास देण्यासाठी जाणीवपुर्वक हा प्रकार केला जात आहे; मात्र पालिका आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा रोष लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. हा आमचा सर्वाचा विजय आहे असे साळगावकर यांनी सांगितले. 

येथील पालिकेच्या हद्दीत नगरपालिकेच्या दिवाबत्तीची कामे करणारे कर्मचारी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कल्पना न देता कमी केले होते. याबाबत वारंवार पत्र व्यवहार करुन सुध्दा संबधितांकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट पस्तीस वर्षापुर्वीपासूनचे कामाचे पैसे भरा, अशी नोटीस पालिकेला बजावण्यात आली होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरुध्द येथील पालिका असा वाद निर्माण झाला होता. याबाबत आपल्याला कर्मचारी मिळालेच पाहीजेच यासाठी प्रसंगी आंदोलन करु, असा इशारा साळगावकर यांनी दिला होता.

त्यानुसार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी श्री. साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले. त्यांनी यावेळी उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना घेराओ घातला. उपस्थितांकडून प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली. चर्चेदरम्यान वसुलीसाठी हे कर्मचारी काढून घेण्यात आले होते; मात्र आता ते पूर्ववत देण्यात येणार आहेत, असे राजे यांनी सांगितले. यावेळी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात जोरदार वाद झाला. पूर्ववत दोन कर्मचारी देत आहोत, असे राजे यांनी पत्र दिल्यानंतर सर्वांनी माघार घेतली. 

उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, अनारोजीन लोबो, शहर अध्यक्ष शब्बीर मणीयार, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, कुणाल श्रृंगारे, प्रतिक बांदेकर, गजा वाडकर, गणेश मिशाळ, शिवानी पाटकर, शैलजा पारकर, श्रृतिका दळवी आदी उपस्थित होते. 

मग सेवाही द्या... 
माजी नगरसेवक विलास जाधव यांनी वीज अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ""सर्वसामान्य गरीब लोकांचे दोनशे तीनशे रुपये बील भरायचे असल्यास त्याचे कनेक्‍शन तोडले जाते. या ठिकाणी शंभर टक्के वसुली आहे. वीज गळती नाही. त्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा द्या.'' 

अन्यथा कार्यालयात डांबून ठेवू... 
यावेळी शिवसेना शहर प्रमुख शब्बीर मणीयार यांनी वीज अधिकाऱ्यांना इशारा दिला. सावंतवाडीच्या नागरीकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडुन होत आहे. सद्यस्थितीत 70 हूून अधिक विजेचे दिवे बंद तसेच अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे. हा प्रकार असाच सुरु राहील्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबू असा इशारा त्यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com