‘एमटीडीसी’ नमली; तारकर्लीत उपोषण मागे

‘एमटीडीसी’ नमली; तारकर्लीत उपोषण मागे

मालवण - पालकमंत्री दीपक केसरकर व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे तारकर्ली येथे कंत्राटी कामगारांचे गेले सहा दिवस सुरू असलेले बेमुदत उपोषण आजच्या सातव्या दिवशी मागे घेण्यात आले. 

याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे लक्ष वेधल्यानंतर अकराही कामगारांना कामावर कायम ठेवत त्यांचे दोन महिन्यांचे थकीत वेतनही खात्यात जमा झाल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. अखेर न्याय मिळाल्यानंतर तारकर्ली, देवबाग व वायरीतील ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.  

तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरमधील अकरा कामगारांना पूर्वसूचना न देता ठेकेदाराने कामावरून कमी केले. त्यांचे दोन महिन्यांचा पगारही दिला नाही. त्यामुळे या सर्व कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे, या मागणीसाठी तारकर्लीचे माजी सरपंच डॉ. जितेंद्र केरकर यांच्या नेतृत्वाखाली ११ कामगारांनी २६ जानेवारीपासून तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. यात अजित गोसावी, देवेन मयेकर, धोंडी केळुसकर, जॉर्ज फर्नांडिस, कुणाल बापर्डेकर, संजीव केळुसकर, सागर करंगुटकर, नंदू जोशी, महेश सावंत, अक्षय भगत, धीरज भगत यांचा सहभाग होता.

उपोषणकर्त्यांना तिन्ही गावांतील ग्रामस्थांसह राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला होता; मात्र सहा दिवसांत प्रशासनाने ठोस भूमिका घेत निर्णय न घेतल्याने उपोषणस्थळी अनुचित प्रकारही घडले होते. उपोषणाच्या आजच्या सातव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी शांततेत उपोषण मागे घेतले. 

आदेशाचे पत्र पाठविले...
नारायण राणे यांनी पर्यटनमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर काल आमदार वैभव नाईक यांनीही जयकुमार रावल यांची मुंबईत भेट घेत कमी केलेल्या अकरा कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी केली. यावेळी पर्यटनमंत्र्यांच्या आदेशाने शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी येथील एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना आदेशाचे पत्र पाठवले. त्यामुळे उपोषणकर्त्या कामगारांच्या हातात कामावर कायम केल्याचे पत्र आल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत व तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या हस्ते उपोषणाचे नेतृत्व करणारे डॉ. जितेंद्र केरकर यांना लिंबू-पाणी देत आणि पुष्पहार घालून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, एमटीडीसीचे व्यवस्थापक एस. ए. कांबळे, स्कुबा डायव्हिंग सेंटरचे व्यवस्थापक डॉ. सारंग कुलकर्णी, भाई मांजरेकर, छोटू सावजी, रवींद्र टेंबुलकर, तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर, प्रदीप मांजरेकर, मंदार लुडबे, उल्हास तांडेल, देवेंद्र खवणेकर, दिलीप घारे, अविनाश सामंत यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो, असे म्हणत उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपोषण मागे घेतल्यानंतर उपोषणाचे नेतृत्व करणारे डॉ. केरकर यांनी न्याय हक्काची लढाई जिंकली असे स्पष्ट केले.

शिवसेनेकडून गावात फूट पाडण्याचे राजकारण करण्यात आले. आम्हाला न्याय देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मोलाची साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणकर्ते कुणाल बापर्डेकर याने पालकमंत्री दीपक केसरकर हे पालक आहेत. त्यांना आम्ही निवडून दिले. सात दिवसात त्यांनी साधी विचारपूसही केली नसल्याने आम्हा उपोषणकर्त्यांना याचा खेद वाटत असल्याचे सांगितले. 

२६ जानेवारीला सुरू झालेल्या बेमुदत उपोषणात अनेकदा वातावरण चिघळण्याचा प्रयत्न झाला. अज्ञातांनी स्कुबा डायव्हिंगचे व्यवस्थापक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. उपोषणस्थळासमोरील रस्त्यावर टायरही जाळले. उपोषणकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे पिंडदान घातले. चौथ्या दिवसापासून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. यात काहींनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com