कणकवली नगराध्यक्ष ‘स्वाभिमान’मध्ये दाखल

कणकवली - नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी रविवारी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. या वेळी सुरेश सावंत, संदेश सावंत, समीर नलावडे, बंडू हर्णे आदी उपस्थित होते. (छायाचित्र : संजय राणे)
कणकवली - नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी रविवारी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. या वेळी सुरेश सावंत, संदेश सावंत, समीर नलावडे, बंडू हर्णे आदी उपस्थित होते. (छायाचित्र : संजय राणे)

कणकवली - शहराच्या नगराध्यक्षा व संदेश पारकर गटाच्या समर्थक माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. गेल्या अडीच वर्षांत मी सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला; परंतु सहकाऱ्यांकडून सतत आकसाचे राजकारण खेळले जात होते. विरोधकांची कामे करू नका, असे सांगितले जात होते. या सर्वाला कंटाळून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सौ. गायकवाड यांनी दिली.

येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत माधुरी गायकवाड आणि त्यांचे पती सोमनाथ गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. या वेळी तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, शहराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे आदी उपस्थित होते.

सौ. गायकवाड म्हणाल्या, ‘‘कणकवलीच्या राजकारणात येण्याची संधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली. नगराध्यक्षपदावर जाण्याची संधी संदेश पारकर यांनी दिली होती. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारच मानतो; पण गेल्या अडीच वर्षांत सहकारी नगरसेवकांकडून आकसाचे राजकारण खेळले जात होते. नगराध्यक्ष या नात्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनाही समान न्याय देण्याचे काम केले.

शहरातील कुठल्याही नागरिकाचे काम करताना त्याचा पक्ष पाहिला नाही; पण माझे नगरपंचायतीमधील सहकाऱ्यांचे ज्यांच्याशी संबंध चांगले नसतील, त्यांची कामे करू नका, असा दबाव येत होता. याखेरीज विरोधी नगरसेवकांचीही कामे करण्याबाबत सहकारी आक्षेप घेत होते.’’

त्या म्हणाल्या, ‘‘एकाचे काम करायचे आणि दुसऱ्याचे नाही, ही भूमिका मला कधीच पटली नाही. सर्वसामान्य नागरिक असो अथवा लोकप्रतिनिधी, सर्वांचे काम करण्याला मी प्राधान्य दिले. त्याचा मला मोठा त्रासदेखील झाला. नगराध्यक्ष हा कुठल्या पक्षाचा नसतो, तर तो सर्वांचाच असतो; पण हीच भूमिका काहींना पटत नव्हती. दरम्यान, आपणाला विरोधी नगरसेवकांनी खूप सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळेच शहरात अनेक विकासाची कामे मार्गी लावता आली.’’

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर, कामाचा धडाका पाहून मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाने संधी दिली, तर यंदाची नगरपंचायत निवडणूकही लढविणार असल्याचे सौ. गायकवाड म्हणाल्या.

२०१३ ची नगरपंचायत निवडणूक राणे आणि पारकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर एकत्रितपणे लढवली आणि बहुमताचे १३ सदस्य संख्याबळ निवडून आले; मात्र सन २०१५ मध्ये झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत संदेश पारकर यांनी राणेंना धक्‍का दिला. विरोधी पक्षांच्या साहाय्याने आपल्या गटाचा नगराध्यक्ष नगरपंचायतीवर बसवला. यात माधुरी गायकवाड यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती; मात्र त्यांनी संदेश पारकर यांची साथ सोडून आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला होता. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांना हा धक्‍का मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com