अधिकाऱ्यांनो, जनतेचे सेवक बनून काम करा - नीतेश राणे

अधिकाऱ्यांनो, जनतेचे सेवक बनून काम करा - नीतेश राणे

देवगड - पाणी हा तालुक्‍याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींप्रमाणे अधिकाऱ्यांनीही जनतेचे सेवक बनून काम केल्यास टंचाई दूर होण्यास मदत होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे येथे व्यक्‍त केले. टंचाई कामामधून स्थानिक जनतेचे समाधान होणार नसेल तर आराखडा बैठका काय कामाच्या असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांनी प्रशासनाला सुनावले. 

जामसंडे येथे आमदार श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्‍याची पाणीटंचाई निवारण कृती आराखडा समन्वय सभा झाली. यावेळी मंचावर तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, गणेश राणे, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर, डॉ. अमोल तेली, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे आदी उपस्थित होते. सुरूवातीला तालुक्‍याच्या टंचाई आराखड्याची श्री. राणे यांनी माहिती घेतली. गतवर्षीच्या आराखड्यातील झालेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. मंजुर असून त्यातील काही कामे पूर्णत्वास न जाण्यामागील कारणेही त्यांनी जाणून घेतली. काही अपूर्ण कामे समोर येताच जुन्या प्रलंबित कामांच्या पुर्ततेसाठी, त्यातील अडचणी दूर करण्यासाठी संबधित ठिकाणच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य किंवा आपली मदत घेण्याची सुचना त्यांनी केली. टंचाई निवारणासाठी संबधित सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह काही प्रमुख ग्रामस्थांना सोबत घेऊन कामे मार्गी लावली जावीत. अधिकाऱ्यांनी केवळ कागदावरील टंचाई निवारण करू नये असे सांगितले. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जावू नये अशीही त्यांनी विचारणा केली. गटविकास अधिकाऱ्यांनी कामांचा आढावा घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

श्री. राणे म्हणाले, ‘‘आराखड्यातील कामे पूर्णत्वास जाण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न हवेत. काही अडचणी असल्यास आपण सहाय करू. पाणी हा येथील जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आराखड्यातील कामे पूर्णत्वास कशी जातील यासाठी प्रयत्नांची गरज आहे. अधिकाऱ्यांनी टंचाई आराखड्याचे सोपस्कार पार न पाडता लोक तहानलेले राहणार नाहीत, जनता समाधानी झाली पाहिजे यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे. पाणी विषयावर चालढकल करून चालणार नाही असे सांगितले. 

तहसीलदार वनिता पाटील यांनी, टंचाई निवारणासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची ठराविक काळानंतर एकत्रित बैठक झाली पाहीजे तरच प्रश्‍न सुटतील असे सांगुन नियोजन गावपातळीवर होणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांमधून मिठबांवमधील प्रश्‍न मांडण्यात आला. सभेला ग्रामिण पाणीपुरवठा शाखा अभियंता वैभव वाळके, संदीप साटम तसेच सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. 

नुसतेच आराखडे नको...
अधिकारी बदलतात मात्र जनतेचे प्रश्‍न कायम राहतात. जुन्याच आराखड्यातील कामे अपूर्ण असतील तर नव्या आराखड्याचा खटाटोप कशाला? असा प्रश्‍न आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला. पाणीटंचाईकडे गांभीर्याने बघण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com