नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने भरपाईची शिफारस

सावंतवाडी ः येथे उपवनसंरक्षकांच्या दालनात झालेली राज्यस्तरीय फळपीक नुकसान समितीची सुरू असलेली बैठक.
सावंतवाडी ः येथे उपवनसंरक्षकांच्या दालनात झालेली राज्यस्तरीय फळपीक नुकसान समितीची सुरू असलेली बैठक.

दोडामार्ग - वन्यप्राण्यांकडून होणारी शेतपीक व शेतीबागायती नुकसानी यापुढे प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या सुधारित दराने मिळावी आणि ज्या पिकांचा व प्राण्यांचा नुकसान भरपाईत समावेश नाही, ती सर्व फळ व शेतपिके यांचा समावेश शासननिर्णयात करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने भरपाई मिळण्याची शिफारस राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती राज्यस्तरीय फळपीक नुकसान समितीने हेवाळे येथे दिली.

दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती शेतपिके व फळांचे प्रती नग व प्रती किलो यानुसार निर्धारित करते त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी शिफारस समिती या अहवालात करणार आहे.
शासनाने कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीत झाराप येथील भावई शेतकरी मंडळाचे प्रतिनिधी संजय सामंत, मच्छिमार प्रतिनिधी रविकिरण तोरसकर, प्रा. डॉ. गणेश मर्गज, नागेश दफ्तरदार, हत्तीबाधित हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई आदींचा समितीत समावेश आहेत. 

जिल्हा उपवनसंरक्षक समाधान चव्हाण हे या समितीचे सचिव आहेत. समितीची शुक्रवारी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक यांच्या दालनात सभा झाली. 

त्यांनतर समितीने हत्तींबाधित हेवाळे गावचा दौरा करत शेतकरी व ग्रामस्थांशी सवांद साधला. यावेळी समिती सदस्य तथा सरपंच संदीप देसाई यांनी समितीचे स्वागत करत हेवाळे गावातील हत्ती प्रश्न व पीक नुकसानी आणि वनखात्याकडे प्रलंबित समस्या समिती समोर मांडल्या. वन विभाग माकड यांचेकडून होणाऱ्या नारळ नुकसानीला प्रती नग फक्त ७ रुपये मूल्य देते. तोच दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने २०-२५ निश्‍चित केला आहे. याचा आधार घेत यापुढे नुकसानी अशा पद्धतीने मिळावी, अशी शिफारस समितीने करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय वनसंज्ञा कायद्या अंतर्गत संपादित क्षेत्रा इतकेच शेतकऱ्यांनी वनविभागाला दिलेल अतिरिक्त क्षेत्र वगळण्याची मागणी करण्यात आली.

तसेच महाराष्ट्र शासन अशी नोंद असलेल्या मात्र आपल्या खाजगी जमिनीत लागवड केलेल्या शेतीची झालेली नुकसानी मिळावी याबाबत लक्ष वेधण्यात आले. तशी शिफारस समिती माफत शासनाकडे करण्याची ग्वाही समिती सदस्य रविकिरण तोरसकर यांनी दिली. समिती अध्यक्ष तथा मुख्य वनसंरक्षक पाटील यांनी अतिरिक्त संपादित जमिनी परत करणेबाबत महसूल विभागाने कार्यवाही करावी असे सूचित केले. त्याच बरोबर वन्य हत्तीं प्रतिबंधासाठी लवकरच हत्ती पकड मोहीम, काँक्रीट भिंत, सौर कुंपण, मधमाशी पालन अशा उपाययोजना लवकरच हाती घेण्याचे आश्वासन सरपंच संदीप देसाई यांना दिले आहे.

यावेळी जिल्ह्यातील गोठस गावचे प्रगतशील शेतकरी दादा बेळणेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील सुतार, तालुका कृषी अधिकारी रणजीत कांबळे, श्री. ठाकूर, वनक्षेत्रपाल सचिन आठवले, पो. पाटील सौ. स्मृती देसाई, प्रकाश देसाई आदी उपस्थित होते. माजी पोलीस पाटील सूर्यकांत देसाई, ग्राम विकास समिती अध्यक्ष काका देसाई, जयवंत देसाई, महादेव ठाकूर, तातोबा देसाई आदींनी वन्यप्राणी नुकसानी व उपाययोजनाबाबत म्हणणे मांडले. हत्ती पकड मोहीम राबविणे, हत्तीकडून होणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करणे, १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौरकुंपण व हेवाळे व तिलारी परिसरात वन्यजीव अभयारण्याबाबत माहिती द्यावी या मागण्यांचे लेखी निवेदन यावेळी सरपंच देसाई यानी मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com