रत्नागिरी - गणपतीपुळेपासून काही अंतरावर असलेला भाग हा मासळीचे आगरच म्हणून ओळखला जातो; परंतु हवामान विभागाकडून वादळाचा इशारा दिल्यामुळे या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत होते. सोमवारी (ता. 19) सकाळी मासेमारीसाठी रवाना झालेल्या नौका माघारी परतल्या आहेत. एखाद दुसरी नौका सुमुद्रात मासेमारी करताना दिसत होते.
अवघ्या चार दिवसातच पुन्हा मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमार अडचणीत आले आहेत. पावसाचा जोर ओसरल्यानंतर रविवारपासून काही नौका समुद्रात रवाना झाल्या. काही नौका किनारपट्टीपासून जवळच्या भागात मासेमारी करत होत्या. इतर मच्छीमार नौका मात्र बंदरांवर उभ्या होत्या. मासेमारीवर जिल्ह्याचे अर्थकारणाचा अवलंबून आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 10 ऑक्टोबरपासून सलग आठ दिवस मासेमारी बंद होती. त्याचा फटका काही कोटींच्या उलाढालीवर झाला. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा मासेमारी सुरु करण्याच्या हालचाली होत्या. मात्र सोमवारी पुन्हा वादळाचा इशारा आल्यामुळे मच्छीमारीवर आस्मानी संकट कोसळले आहे. खोल समुद्रात पाण्याला करंट असून वेगवान वारे वाहत आहेत.
अनेक नौका अजूनही जयगड, वेलदूर, दाभोळ बंदरातच आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून पुढील दोन दिवस वादळासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने शनिवारी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या. गणपतीपुळे पासून पुढे 10 ते 12 वावात अनेक नौका मासेमारीसाठी सरसावतात; परंतु सोमवारी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याही नौका तिथे दिसत नव्हत्या. त्यामुळे हा हंगाम मच्छीमारांसाठी अडचणीचा ठरणार आहे.
वादळामुळे समुद्रातून मासळीच गायब झाली आहे. पुन्हा वारा वाहू लागल्यामुळे नौकाही माघारी येत आहेत. त्यामुळे मच्छीमार अडचणीत सापडला आहे.
- अभय लाकडे, मच्छीमार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.