रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी समृद्ध कोकण महामार्ग अभियान सुरू करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासियांच्या समितीने महामार्गाचा अभ्यास दौरा सुरू केला आहे. कोकणात दर्जेदार महामार्ग तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे, असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांनी सांगितले.
या महामार्गावर गेल्या दहा वर्षात हजारो कोकणी बांधव मृत्युमुखी पडले. त्यांना श्रद्धांजली वाहून यादवराव म्हणाले, कोकण महामार्ग समन्वय समितीच्या समृद्ध कोकण महामार्ग अभियानाची सुरवात करण्यात आली. महामार्गाचे काम विविध कारणांमुळे रेंगाळले. त्यामुळे कोकण पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागली. पळस्पे ते पोलादपूर या पहिल्या टप्प्याची पाहणी आणि अभ्यास समिती सदस्यांनी केला. पुढील सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.
कोकणवासियांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावी. व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण करावा, असेही यादवराव यांनी आवाहन केले. यावेळी यशवंत पंडित, ऍड. ओवेस पेचकर, विकास शेट्ये, विलास नाईक, ऍड. मंगेश नेने, संतोष ठाकूर, सुरेश म्हात्रे, नीलेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
कोकणातच खड्डे का?
पाऊस जेवढा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पडतो तेवढाच पाऊस मुंबई-गोवा महामार्गावर पडतो. मग दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावरच 2- 4 फुटाचे खड्डे कसे काय पडतात? सहा महिने खड्डे रस्ता आणि मग सहा महिने चांगला रस्ता असे किती वर्षे चालणार? असा सवाल संजय यादवराव यांनी केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.