कटकटीला कंटाळून गावकऱ्यांनी हाती घेतला ऊसतोडीसाठी कोयता

sugarcane issue vaibhavwadi konkan sindhudurg
sugarcane issue vaibhavwadi konkan sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) -  कोरोनामुळे ऊसतोडणी मजुरांची वानवा, तोडणीसाठी कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह टोळी प्रमुखाला कराव्या लागणाऱ्या विनवण्या, द्यावी लागणारी अवास्तव `एन्ट्री` आणि विलंबाने होणाऱ्या तोडीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या कटकटीवर मात करण्यासाठी नापणे जैतापकरवाडी येथील आठ ते दहा शेतकऱ्यांनीच ऊसतोडणी सुरू केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये झालेला हा सकारात्मक बदल जिल्ह्यातील ऊस शेती क्षेत्रातील क्रांतीकारक पाऊल मानले जात आहे. 

असळज (ता.गगनबावडा) येथे डॉ. डी. वाय. पाटील ऊस कारखाना निर्मितीनंतर जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी या दोन तालुक्‍यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सरासरी 1 लाख टन ऊस उत्पादित होतो. त्यातील अधिकतर उसाची तोडणी डी. वाय. पाटील कारखान्याकडुन तर काही शेतकऱ्यांचा ऊस राधानगरी कारखान्याकडुन तोडला जातो; परंतु मागील 15 वर्षांपासूनचा ऊस लागवड क्षेत्राचा वाढता आलेख गेल्या दोन तीन वर्षात कमी होताना दिसत आहे. ऊसतोडणीसाठी करावी लागणारी कसरत हे त्यातील प्रमुख कारण आहे.

ऊसतोडणी वेळेत व्हावी यासाठी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना विनवणी करावी लागते.याशिवाय ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांचा म्होरक्‍याला शेतकऱ्यांना हात जोडावे लागतात. ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्यांची संख्या कमी असल्यामुळे म्होरके देखील तोडणीसाठी एकप्रकारे बोली लावतात.त्याला त्यांच्या भाषेत एन्ट्री असे संबोधले जाते. ही एन्ट्री तीन, चार, पाच ते अगदी दहा हजारापर्यत असते. अधिक रक्कम जो शेतकरी देतो त्याचा ऊस तोडणी वेळेत होते. या अशा प्रकीयेमुळे शेतकऱ्यांमध्ये चढओढ असते.

वेळेत ऊसतोडणी झाली नाही तर ऊसाचे वजन कमी भरते. पर्यायाने मोठे नुकसान शेतकऱ्याचे होते. ऊस शेतीतील या प्रमुख समस्येमुळे गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरविली आहे. 
दरवर्षीच्या हंगामापेक्षा यावर्षीचा हंगाम त्यापेक्षा वेगळा आहे. यावर्षी कोरोनामुळे बीड, परभणी यासह विविध भागातुन ऊसतोडणीसाठी येणारे कामगार खूप कमी प्रमाणात आले आहेत. त्यामुळे तोडणीच्या समस्येला सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. हीच समस्या भेडसावणाऱ्या नापणे जैतापकरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रकाश जैतापकर, हरिश्‍चंद्र जैतापकर, विनोद जठार, यशवंत यादव, काशिराम यादव, तुळशीराम यादव, महेश यादव, अजित यादव, राजाराम यादव, संतोष यादव, हर्षदा जैतापकर, उर्मिला जैतापकर यांनी आपला ऊस आपण तोडायचा निर्धार केला आहे.

त्यादृष्टीने त्या शेतकऱ्यांनी ऊसतोडणीसाठी लागणारी अवजारे तयार करून घेतली. ऊसतोडणीच्या क्षेत्रात हे शेतकरी नवखे असले तरी दिवसाला 10 ते 12 टन ऊसतोड ते करीत आहेत. आतापर्यंत तीस ते चाळीस टन ऊस तोडणी त्यांनी केली आहे. ऊस तोडणी करणे, त्याच्या मोळ्या बांधणे, त्या ट्रकमध्ये भरणे ही सर्व कामे ते करीत आहेत. उर्वरित ऊसाची तोडणीही ते करणार आहेत. या शेतकऱ्यांनी एकत्र येवुन केलेला हा प्रयोग यशस्वी होताना दिसत असून तोडणी समस्येवर तो रामबाण उपाय ठरत आहे. 

ऊस तोडणीसाठी कारखान्याकडुन प्रतिटन 300 रूपये दिले जातात. प्रत्यक्षात तोडणीला खर्च जास्त येतो; परंतु स्थानिक शेतकऱ्यांनीच तोडणी केली तर ती वेळेत होईल. वेळेत तोडणी झाल्यामुळे वजन देखील चांगले भरेल. याशिवाय टोळीला एन्ट्री देखील द्यावी लागणार नसल्याचे काहींनी सांगितले. 

क्रांतीकारक पाऊल 
भविष्यात ऊसतोडणी कामगारांची वाणवा भासणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड, खते, पाणी, कीटकनाशक व्यवस्थापनासोबतच यापुढील काळात ऊस तोडणीचे तंत्र अवगत करण्याची गरज भासणार आहे. नापणे येथील शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने उचललेले पहिले पाऊल ऊसशेतीच्या क्षेत्रात क्रांतीकारक ठरणार आहे. 

गेल्या काही वर्षांत ऊसतोडीची समस्या होतीच; परंतु यंदा कोरोनामुळे त्यात भर पडली. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी तोडणी, मोळ्या बांधणी, ट्रकमध्ये ऊस भरणे ही कामे करण्याचा निश्‍चय केला आहे. लवकरच संपुर्ण ऊस तोडीतील तंत्र अवगत करू. 
- प्रकाश जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com