रस्ता न झाल्यास गणपती पूजनच नाही; सिंधुदुर्गातील 'या' गावचा निर्णय

रस्ता न झाल्यास गणपती पूजनच नाही; सिंधुदुर्गातील 'या' गावचा निर्णय

ओटवणे - असनिये - कोनशी हद्‌दीवरील दुसकवाडी ते कोनशी बाबरवाडी मार्गाला अतिवृष्टीने तडे जाऊन रस्ताच वाहून गेल्याने स्थानिक 26 कुटुंबांचा कोनशी गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे घराबाहेर पडायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. शासन स्तरावर याबाबत लक्ष वेधून सुद्धा कोणतीच कार्यवाही न झाल्याने रस्ता न झाल्यास गणपतीचे पूजनच करणार नाही, अशी टोकाची भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली आहे. 

याबाबतचे निवेदन दुसकवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच विविध खात्याच्या विभागांना दिले आहे. दुसकवाडी ही असनिये ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात समाविष्ठ आहे. परंतु डोंगर भागातील परिसरात मोडणाऱ्या असनिये व अतिदुर्गम भागातील दुसकवाडी या दोन्ही मधील अंतर बघता दुसकवाडी साठी कोनशी गांव सर्वस्वी दृष्ट्‌या सोयीस्कर ठरतो. 

विविध आर्थिक व्यवहार तसेच मुलांना शिक्षणासाठी कोनशी गावातच दुसकवाडी ग्रामस्थ पाठवितात. पण रहदारीचा एकमेव सोयीस्कर मार्गच असलेला दुसकवाडी ते कोनशी बाबरवाडी मार्ग खचल्याने दुसकवाडी ग्रामस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 
या महत्त्वाच्या मार्गावर अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी दरड कोसळले, भले मोठे तडे गेले तसेच काही ठिकाणचा रस्ताच वाहून गेल्याने प्रवास करायचा कसा अशा विवंचनेत येथील कुटुंबे आहेत. 

रस्ताच नसल्याने मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होतेय.प्रवास यंत्रणाही बंद झाली. शासनाची मदत देखील पोहचत नाही. बाप्पाचे आगमन आठवड्यावर येऊन ठेपले असून रस्ताच नाही तर गणेश मूर्ती आणायची कशी? या समस्येबाबत सरपंच सुभाष सावंत यांनी प्रशासनाचे यापूर्वी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते; पण शासन सुद्धा त्याकडे टाळाटाळ करीत असून अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने गणपती बाप्पाचे पूजन करणार नाही आणि मुलांनाही शाळेत पाठविणार नाही, असे निवेदन दुसकवाडी ग्रामस्थांनी दिले.

यावेळी रवींद्र काळे, गुरुनाथ सावंत, वामन सावंत, संजय गवस, नामदेव गवस, सिद्धेश गवस, आयुष गवस, नितीन गवस, सुरेश गवस, वासुदेव गवस, अनंत काळे, मनोज कामत, मिलिंद कामत, सुवर्णा सावंत, पुंडलिक गवस, महेश गवस आदि उपस्थित होते. 

मदतीपासून उपेक्षितच 
पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे.परंतु सह्याद्री पट्ट्यात अशीही गावे आणि वाड्या आहेत तेथे मदत तर सोडाच पण रस्ताच नसल्याने संपर्क पण होऊ शकत नाही. दुसकवाडीची हि व्यथा 15 दिवस ग्रामस्थांना सलत आहे. लोकप्रतिनिधी, पुढारी, तसेच प्रशासनाचे अधिकारी सुद्धा इथे फिरकले नसल्याचा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. येथील 26 कुटुंबे मात्र मदतीपासून वंचितच आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com