
कणकवलीत १२०० अर्ज दाखल
कणकवलीत १२०० अर्ज दाखल
५८ पैकी ५१ ग्रामपंचायतींची स्थिती; सोमवारी होणार छाननी
कणकवली,ता. २ ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अखेरचा दिवस निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्याच्या सूचना केल्यानंतर थेटपणे आज सकाळपासून तहसील कार्यालयात कमालीची गर्दी होती. आज सायंकाळी उशीराने मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १२०० अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील ५८ पैकी ५१ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी १९६ तर सदस्यपदासाठी ९८० अर्ज दाखल झाल्याची नोंद मिळाली. ही प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. तालुक्यातील थेट सरपंच पदासाठी कासार्डे ९, फोंडाघाट ८ , कलमठ ७, हरकुळ बुद्रुकला ६, नांदगाव आणि दिगवळेसाठी प्रत्येकी ५ अर्ज दाखल झाले.
उमेदवारी अर्ज भरत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीची शपथपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज पूर्ण करावे लागत होते. त्यामुळे रांगेत राहून इच्छुक उमेदवारांना आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागत होती. कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी आतापर्यंत मिळालेल्या माहीतीनुसार जवळपास १२०० पेक्षा अधिक उमेदवांरानी अर्ज दाखल झाले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने येथे मोठी गर्दी होती. त्यामुळे तालुक्यात ५८ सरपंच पदासाठी २०० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून १८८ प्रभाग सदस्य पदासाठी ९०० ते १००० उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरणा करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक कार्यालयात प्रवेश दिला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शेवटच्या उमेदवाराची नामनिर्देश पत्रे दाखल करून घेतली जात होती. रात्री उशीराने सर्व माहिती मिळेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांनी सांगितले. दाखल अर्जांची छाननी सोमवारी ५ डिसेंबरला सकाळी अकराला होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे.