
महामार्गालगतचे स्टॉल ठरताहेत अपघातांना निमंत्रण
66584
कणकवली : महामार्गालगत उभारण्यात आलेल्या स्टॉलमुळे सेवा रस्त्यावरून वाहने दिसत नसल्याने अपघात होत आहेत.
-------------
महामार्गालगतचे स्टॉल ठरताहेत अपघातांना निमंत्रण
उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांची संख्या वाढतीच; महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष
कणकवली, ता. ५ : कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील दररोज नवनवीन स्टॉल उभे राहत आहेत. या स्टॉलमुळे सेवा रस्त्याच्या मिडलकट वरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. मात्र उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्याबाबत महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष होत आहे.
कणकवली शहरातून सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात आला. तर उड्डाणपुलाखालील भालचंद्र आश्रमाकडे जाणारा रस्ता, तेलीआळी डीपी रोड, पेट्रोल पंप आणि बसस्थानक या ठिकाणी दोन सेवा रस्ते जोडण्यासाठी मिडलकट ठेवले आहेत. या मिडलकटवरून येणारी वाहने सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे वारंवार अपघात होत आहे. गतवर्षी बसस्थानकासमोरील मिडलकटवरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला गोवा ते मुंबई जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाची धडक बसली होती. यात दुचाकीस्वार ठार झाला होता. तर काल (ता. ४) गोवा ते मुंबई जाणाऱ्या टेम्पो चालकाला मिडलकटवरून बसस्थानकाच्या दिशेने जाणारी बस दिसली नाही. त्यामुळे टेम्पो धडक थेट एस. टी. ला बसली. सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झाले नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृत स्टॉल उभारले आहेत. दिवसेंदिवस या स्टॉलची संख्या वाढत असून मिडलकट वरून थेट रस्त्यावर येईपर्यंत ही वाहने दिसत नाहीत. त्यामुळे शहरातील मिडलकटवर वारंवार अपघात होत आहेत. मात्र उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्याबाबत महामार्ग विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.