
मळे लावणीची लगबग; मशागतीचे काम सुरू
मळे लावणीची लगबग;
मशागतीचे काम सुरू
रसायनी, ता. ९ : रसायनी पाताळगंगा परिसरातील सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबारा पिकांसाठी शेतात मशागतीचे काम सुरू केले आहे. जांभिवली गावाच्या हद्दीतील माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाचा जांभिवली पंचक्रोशीतील तसेच पाताळगंगा नदीकाठच्या गावांतील आणि मोहोपाडा येथील शेतकरी एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर भाजीपाला आणि भाताचे पीक घेत आहे.
परिसरातील चावणे, आपटे, वडगाव, वासांबे मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत असतात. यावर्षी सुरुवातीला लवकर लावणी आणि जास्त उंचीच्या भातपिकाला परतीच्या पावसाचा काहीसा फटका बसला आहे. मात्र, आता बहुतेकांचे भातपीक चांगले आल्याने शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे सिंचनाचा आधार असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार भाजीपाल्याचे मळे लावण्यासाठी मशागतीचे काम सुरू केले आहे. भेंडी, काकडी, शिरोळी, घोसाळी जास्त प्रमाणात पीक घेतले जाते. तसेच कारली, पडवळ, मिरची, गवार, कोथिंबीर, वांगी आदी पीक घेत आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, बैलाच्या साह्याने शेतात चांगली मशागत करता येत आहे.