
वळकेत सरपंचपदासाठी माजी उपसभापती रिंगणात
rat१२३९.TXT
(पान २ साठीमेन)
वळकेत सरपंचपदासाठी माजी उपसभापती रिंगणात
ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने ; कार्यकर्त्यांनी कसली कंबर
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १२ ः तालुक्यातील हात खंबा जिल्हा परिषद गटातील वळके आणि बांबर या दोन ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे सेना विरुद्ध बाळासाहेबांची सेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. वळकेतील सरपंचपदासाठी बाळासाहेबांच्या सेनेकडून माजी उपसभापती उत्तम सावंत रिंगणात उतरल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हातखंबा जिल्हा परिषद गटातील दोन ग्रामपंचायतीत ठाकरे-शिंदे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वळके ग्रामपंचायतीत सहा जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यावर ठाकरे सेनेकडून दावा करण्यात आला आहे. तर तीन जागांसाठी निवडणूक होणार असून सहा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी दुरंगी लढत निश्चित झाली आहे. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे उत्तम सावंत हे सरपंचपदासाठी उभे आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित आघाडीच्या युतीचे उमेदवार मुकुंद सावंत हे उभे आहेत.
शिंदे गटाचे उत्तम सावंत हे माजी उपसभापती होते, तर मुकुंद हे ग्रामपंचायत सदस्य होते. या ग्रामपंचायतीत चुरशीची लढत होईल असा अंदाज बांधला जात आहे. तसेच बांबर ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांपैकी पाच बिनविरोध करण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. बिनविरोध जागांच्या ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे एका जागेसाठी निवडणूक होणार असून दोन उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी तीन महिलांमध्ये चुरस आहे. त्यात ममता चव्हाण या ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवाराला ठाकरे सेनेकडून पाठबळ दिले गेले आहे. तृप्ती पेडणेकर आणि तृप्ती चव्हाण या अन्य दोन उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी महिला तालुकाप्रमुख साक्षी रावणंग, उपविभागप्रमुख प्रदीप घडशी, जिल्हा परिषद माजी सभापती परशुराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे.
कोट
वळके आणि बांबर या दोन्ही ग्रामपचायतीच्या निवडणुकीत ठाकरे सेनेचे वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
- परशुराम कदम, माजी सभापती, जिल्हा परिषद