
रत्नागिरी-11 महिन्यांत 274 जणांचे वाहन परवाने निलंबित
जिल्ह्यात २७४ जणांचे
वाहन परवाने निलंबित
रत्नागिरी, ता. २१ : वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास वाहन परवाना निलंबित होतोच; पण त्याबरोबरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कमही भरावी लागते. गेल्या ११ महिन्यांत कार्यालयाकडून २७४ जणांचे वाहन परवाने निलंबित केले आहेत. आणखी २५८ जणांच्या वाहन परवान्याबाबत प्रक्रिया सुरू आहे.
अल्पवयीन मुले वाहन चालविताना अनेक जीवघेणे अपघात होतात. हे धोके लक्षात घेऊन नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहन चालवावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या ११ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २७४ परवाने निलंबित केले आहेत. वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहन चालविण्याचे हे परिणाम आहेत. कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.