
आळवाडी पुलावरील भराव धोकादायक
71206
बांदा ः शेर्ले नदीपात्रावरील पुलाच्या जोडरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
आळवाडी पुलावरील भराव धोकादायक
जोडरस्ता दुरुस्तीची मागणी; भाजपचा आंदोलनाचा इशारा
बांदा, ता. २६ ः तेरेखोल नदीपात्रावर आळवाडी येथे जीवन प्राधिकरण विभागातर्फे उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंकडून मातीचा भराव टाकण्यात आल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. बांदा शहरात येण्यासाठी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी या धोकादायक रस्त्याचा वापर करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीने पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्याची दुरुस्ती करावी; अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे सावंतवाडी तालुका सदस्य गौरांग शेर्लेकर यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘‘शेर्ले दशक्रोशीतील लोकांच्या मागणीनुसार या नदीवर पूल उभारण्यात आला. यावरून गतवर्षी दुचाकी वाहतूकही सुरू झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता न बनविता केवळ मातीचा भराव टाकण्यात आला. पुलावरून खाली उतरताना तीव्र उतार असल्याने या ठिकाणी बरेच छोटे-मोठे अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी काळोखात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने कित्येक दुचाकी चालक खाली चरात कोसळून जखमी झाले आहेत. शेर्ले दशक्रोशीतून बांदा शहरात येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते; मात्र रस्ता नसल्याने ही वाहतूक जीवावर बेतणारी ठरते. त्यामुळे तातडीने पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम करावे; अन्यथा आंदोलन करू.’’