
खेड ः महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले
महामार्ग चौपदरीकरणः लोगो
-rat12p3.jpg
21244
खेड ः महामार्गावरील दाभिळ पुलाचे रखडलेले काम. (सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा )
--------------
संथ गतीने काम; वाहतूकीचा चक्का जाम
पावसाळ्यात वाहनचालकांची कसरत; दाभिळ आणि भरणेतील पुलाचे काम अर्धवटच
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ ः पावसाळा तोंडावर आला तरी महामार्ग चौपदरीकरणादरम्यान सुरू असलेले भरणे आणि दाभिळ येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने या वर्षीही मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पावसाळ्यात अडथळ्यांची शर्यत पार करत प्रवास करावा लागणार आहे. भरणेनाका येथील पुलाचे काम रखडल्याने आताच रहदारीचे तीनतेरा वाजले आहेत. रहदारीचे योग्य नियोजन नसल्याने या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे खेड तालुक्याच्या हद्दीतील काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतले आहे. सुरवातीला या कंपनीने अतिशय वेगवान आणि चांगले काम केले; मात्र सद्यःस्थितीत ठेकेदार कंपनीने चौपदरीकरणाच्या कामाचा पुरता खेळखंडोबा केला असून याचा नाहक त्रास महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि स्थानिकांना सहन करावा लागतो आहे.
गेल्या काही वर्षात भरणेनाक्याचा परिसर व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकसित झाला असल्याने या ठिकाणी वाहने आणि पादचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात गर्दी असते; मात्र या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम तब्बल तीन वर्षे सुरू असल्याने पादचारी, व्यावसायिक आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो आहे. भरणे येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात वाहतुकीला खुला केला जाईल, असे महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत होते; मात्र आता जून महिना जवळ आला तरी पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.
..
चौकट
उडणारी धूळ अपघाताचे कारण
भरणेनाका येथील जगबुडी पुलाच्या अप्रोच रोडची अवस्थाही अतिशय दयनीय आहे. अप्रोच रोडवर पडलेले खड्डे वाहतुकीस अडथळे ठरत असतानाच या ठिकाणी उडणारी धूळ अपघाताचे कारण ठरण्याची शक्यता आहे. महामार्गावरील दाभिळ येथील उड्डाणपुलाचे कामही असेच रखडले आहे. आता उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू असली तरी पुलाचे क्रॉंक्रिटीकरण झालेले नाही. आताच या पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुलाचे क्रॉंक्रिटीकरण झाले नाही तर या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होणार आहे. ही संभाव्य बाब लक्षात घेत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला आवश्यक त्या सूचना देऊन काम पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
--------------------
चौकट
ठेकेदारांची दिरंगाई
महामार्गाच्या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून कामामध्ये दिरंगाई सुरू आहे. आज तीन वर्षे काम सुरू असून या वेळकाढू कामामुळे व्यापारीवर्गासह स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक हैराण झाले आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यापारी अनंत तांबिटकर यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57434 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..