
रत्नागिरी ः खत पुरवठा कंपन्यांचे नियोजन बारगळले
L21387ः संग्रहीत
...
खताचा तुटवडा, अल्पच पुरवठा
रत्नागिरी, सिंधुदुर्गातील शेतकरी चिंतेत; कंपन्यांचे नियोजन बारगळले, कोरेतून वाहतुकीची प्रतीक्षाच, १५ टक्केच प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला खत पुरवठा करण्यासाठी नियुक्त कंपन्यांनी नियोजन केलेले नसल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्याला १४ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर असून मे महिन्यापर्यंत साडेतीन हजार मेट्रिक टन येणे अपेक्षित होते; परंतु आतापर्यंत अवघे ६३६ मे. टन म्हणजेच अवघे पंधरा टक्केच खत प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात खताचा तुटवडा जाणवत असून शेतकरी नाराज झाले आहेत. नियोजन बारगळल्याने हा गोंधळ उडाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या रस्तेमार्गे पुरवठा सुरू असून, कोकण रेल्वेचा पर्याय अवलंबलेला नसल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात गतवर्षी १३ हजार ५१९ मे. टन खताचा तर ६ हजार ०६१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला होता. २०२२ च्या खरीप हंगामासाठी विविध खतांची २२ हजार १४६ मे. टनाची मागणी केली असून, शासनाने १४ हजार ६४० मे. टन आवंटन मंजूर केले आहे. तसेच ९ हजार ४५४ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. यातील मे महिन्यापर्यंत साडेतीन हजार मे. टन खत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु तुलनेत १५ टक्केच खत आले. वाहतुकीच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कारण खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे सध्या रस्तेमार्गे खत आणले जात आहे. दुसरा आठवडा संपत आला तरीही पुरेसे खत प्राप्त झालेले नसल्याने शेतकरी राजा नाराज झाला आहे. यंदा पाऊस अपेक्षेपूर्वीच सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे भात पेरण्यांना लवकर आरंभ होईल. त्या आधी खतं शेतकऱ्यांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. अन्यथा पेरण्या विलंबाने कराव्या लागतील. युक्रेन-रशिया युद्धामुळे खतांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळेत मागणी नोंदवण्याचे आवाहन पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही चालू झाली आहे. काही सोसायटींमार्फत खतांची मागणी केली होती. रत्नागिरी, दापोली, लांजा, राजापूर, चिपळुणातील सोसायटींना खताचा पुरवठाही झाला आहे; पण आलेले खत कमी असल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे.
------------
चौकट
लवकरच खताची रेल्वेने वाहतूक
दरवर्षी कोकण रेल्वेतून हजारो टन खत वाहतूक होते. कोरोना काळातही कोकण रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली. खत वाहतूक सुरू करण्यासाठी खत कंपनी आणि रेल्वे प्रशासनात चर्चा सुरू आहे. लवकरच खताची रेल्वेने वाहतूक केली जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
..
चौकट
उपलब्ध खत
प्रकार* साठा (मे. टन)
युरिया* २६८
सुफला* २३४
१०-२६-२६* ८०
बफर स्टॉक* ५४
---
कोट
कंपन्यांकडून खतपुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. खताचा वेळेत पुरवठा करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
- अजय शेंडे, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद
..
चौकट
जिल्ह्यात गतवर्षी पुरवठा असा..
खताचाः १३ हजार ५१९ मे. टन
बियाण्यांचा पुरवठा झालाः ६ हजार ०६१ क्विंटल
..
२०२२ च्या खरीप हंगामासाठीः
खतांची मागणीः २२ हजार १४६ मे. टन
शासनाने आवंटन मंजूर केलेः १४ हजार ६४० मे. टन
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57588 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..