
शिवडाव धरणाचे पाणी सोडले गडनदीत
kan१८३.jpg
२२५७५
कणकवली : येथील गडनदीपात्रात शिवडाव धरणाचे पाणी येऊ लागले आहे.
--------------------
शिवडाव धरणाचे पाणी गडनदीत
कणकवलीकरांची पाणी टंचाईतून सुटका; दोन दिवसांत बंधारे भरणार
कणकवली, ता. १८ : अखेर शिवडाव धरणातील पाणी गडनदीपात्रात येऊ लागल्याने कणकवलीकरांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे. पुढील दोन दिवसांत शहरातील तीनही बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा होणार आहे. कणकवली शहराबरोबर लगतच्या हरकुळ, हळवल, वागदे, कलमठ, आशिये या गावांतील नळयोजनांही शिवडाव धरणातील पाणी साठ्याचा मोठा उपयोग होणार आहे.
यंदा गडनदीपात्रात उशिरा पाणी अडविण्यात आले. त्यामुळे कणकवलीसह लगतच्या गावांत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. कणकवली शहराला दररोज १५ लाख लिटर्स पाण्याची आवश्यकता भासते. मात्र नदीपात्रातील पाणी आटल्याने शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी तातडीने पत्रव्यवहार करून जलसंपदा विभागाला शिवडाव धरणातील पाणी सोडण्याची विनंती केली.
दरम्यान ११ मे रोजी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांच्याशी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी चर्चा केली. कदम यांनी कणकवली नगरपंचायतीकडे २ लाख ४ हजार ७०० रूपये पाणी पट्टी थकीत असल्याचे स्पष्ट केले होते. तर ही थकीत पाणी पट्टी पुढील काही दिवसांत भरण्याची ग्वाही नगरपंचायतीकडून दिली होती. त्यानंतर १२ मे रोजी शिवडाव धरणातील पाणी साठा गडनदीपात्रात सोडण्यात आला. त्यानंतर शिवडाव धरणातील पाणी गडनदीपात्रात येऊ लागल्याने सुकलेले गडनदीपात्र पुन्हा निळेशार होऊ लागले आहे. पुढील दोन दिवसांत गडनदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात येऊ लागल्याने कणकवली शहरासह हळवल, हरकुळ बुद्रूक, सांगवे, वागदे, कलमठ आदी गावांनाही या पाण्याचा फायदा होणार असून, या गावामधील नळयोजनांना पुन्हा कार्यान्वित होणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59220 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..