
दुग्ध व्यवसायातून आर्थिक समृद्ध व्हा
L23190
- कुडाळ ः येथील सिंधु कृषी, पशुपक्षी प्रदर्शनात पशुसंवर्धन विषयक चर्चासत्रात बोलताना अरविंद पाटील. (छायाचित्र ः अजय सावंत)
दुग्ध व्यवसायातून समृद्ध व्हा
अरविंद पाटील ः कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः दुग्धव्यवसाय हा किफायतशीर असून कोकणात दुधाची निर्मिती करण्याला मोठा वाव आहे. पशुधनाला आवश्यक असलेला चारा उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळून दुग्धव्यवसायात क्रांती करून आर्थिक समृद्ध बनावे, असे आवाहन कोल्हापूर चिखली येथील प्रगतशील पशुपालक तथा अरविंद पाटील यांनी येथील सिंधु कृषी, पशुपक्षी प्रदर्शनात पशुसंवर्धन विषयक चर्चासत्रात केले. नवीन एसटी डेपोच्या मैदानावर (हायवेनजिक) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत सिंधु कृषी, पशुपक्षी व पर्यटन महोत्सव गेले तीन दिवस सुरू आहे. या महोत्सवात अरविंद पाटील बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, "दुग्धव्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. राज्यात सर्वात जास्त दुधाचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यात होते. या जिल्ह्यात प्रतिदिन २० ते २५ लाख लीटर दूधाची निर्मीती होते. कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन २० लाख लीटर दुधाची निर्मीती होती. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यात दुधाचे उत्पादन घेतले जाते. सर्वात कमी दुधाचे उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन २० हजार लीटर एवढे होते. औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद आदी भागात दुधाचे उत्पादनच होत नाही. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यांसह संपूर्ण कोकणात दुधाची मागणी मोठी आहे; मात्र त्या तुलनेत दुधाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे गोकुळ, अमूल, स्फूर्ती दूध या ठिकाणी विक्रीसाठी आणले जात आहे. घाटमाथ्यावरील दुधाला याठिकाणी मागणी वाढत आहे. कोकणात दुग्धव्यवसायाला पोषक वातावरण आहे. पशुधनाला आवश्यक असलेल्या चाऱ्यासाठी येथील जमीन चांगली आहे. त्यामुळे सध्या दुधाची वाढती मागणी लक्षात घेता दुधाचे उत्पादन सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात वाढले पाहीजे. त्यासाठी येथील शेतकरी पशुपालकांमध्ये ऊर्जा निर्माण केली पाहीजे. येथील पशुपालक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाकडे वळावे. यातून आर्थिक समृद्ध बनावे. या व्यवसायासाठी शासनाच्या विविध नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घ्यावा. बचतगटांनीही दुग्धव्यवसायाकडे वळावे. कृषी व पशुसंवर्धन विभागाचे मार्गदर्शन घेऊन दुग्धव्यवसायात क्रांती करावी. दुग्धव्यवसायासाठी विविध जातीच्या पशुधनाचा सांभाळ करावा. जनावरांच्या गोठ्याची निगा राखावी. जनावरांचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. जनावरांना चारा तसेच पशुखाद्य वेळेत व पुरेसे द्यावे. कोकणात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या फार कमी आहे. घाटमाथ्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पशुपालकांनी बोलावताच ते वेळीच हजर होतात. इथे तसे होत नाही. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याची काळजी गांभीर्यपूर्वक घ्यावी."
--------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59962 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..