
पुर्वमोसमीमुळे आंबा हंगामास पुर्णविराम
पूर्वमोसमीमुळे आंबा हंगामास पूर्णविराम
सरीवर सरी; बागायतदारांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २० ः जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) सायंकाळी सुरू झालेल्या पूर्वमोसमी पावसाच्या सरी आज सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या. तब्बल २२ तास पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे यावर्षीच्या आंबा हंगामाला दहा दिवस अगोदरच पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. हवेत प्रचंड गारवा असून सर्वत्र पावसाळी वातावरण आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांत वातावरणात मोठे बदल झाले. गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे वातावरण होते. सायंकाळी सातच्या सुमारास वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तासभर पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. रात्री आठ-नऊपर्यंत जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. अखंडपणे आज सायंकाळी पाचपर्यंत पाऊस पडत होता. पावसामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला असून, उष्म्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांची सुटका झाली आहे.
पूर्वमोसमी पावसाचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला असून, यावर्षीच्या आंबा, काजू हंगामाला दहा दिवस अगोदरच पूर्णविराम मिळाला आहे. आंबा हंगाम ३० मेपर्यंत चालेल, अशी अपेक्षा होती. याशिवाय पालवी काजू उत्पादन देखील महिना अखेरपर्यंत मिळेल, अशी बागायतदारांना अपेक्षा होती; परंतु पावसामुळे अंतिम टप्प्यातील उत्पादन वाया जाणार आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होणार आहे. काढणी केलेल्या आंब्याची विक्री करताना देखील अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
पूर्वमोसमी बुधवारपर्यंत पडणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने १८ ते २२ या कालावधीत यलो अलर्ट जाहीर केला होता. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवसांचा अंदाज आज हवामान विभागाने जाहीर केला आहे. पूर्वमोसमी पाऊस २५ मे पर्यंत पडणार असल्याचा अंदाज दिला असून रविवारी (ता. २२) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विवाह समारंभामध्ये व्यत्यय
जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी विवाह समारंभ होते; परंतु पावसामुळे समारंभासाठी घातलेले मंडप, डेकोरेशनचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी छत्र्या घेऊनच विवाह लावण्यात आले. दरम्यान, २२ मेस विवाह मुहूर्त असून त्या दिवशी देखील पावसाचा अंदाज असल्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60146 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..